तंत्रज्ञानामुळे एकाग्रता कमी झालीय, लक्षातही राहत नाही, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:57 PM2022-02-08T14:57:00+5:302022-02-08T15:05:53+5:30

अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात काही प्रमाणात विसरभोळेपणा वाढलेलाच आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नेहमी वर्दळीत असलेल्या व्यक्तींचा जास्त काळ हा घरातच गेला आहे.

अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात काही प्रमाणात विसरभोळेपणा वाढलेलाच आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे नेहमी वर्दळीत असलेल्या व्यक्तींचा जास्त काळ हा घरातच गेला आहे.

त्यामुळे त्यांचा संवाद कमी होऊन शारीरिक हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ताणतणाव वाढून विसरभोळेपणा वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोना परिस्थितीमुळे मानवाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी विस्मरणात जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

कोरोनाचा अति ताण घेतल्यामुळेही अनेकांमध्ये विसरभोळेपणाची लक्षणे दिसत आहेत. अति ताण, चिंता यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमकुवत होते. या प्रकाराला 'स्यूडो डेमन्सिया' असे म्हटले जाते.

वृद्धांमध्ये या तक्रारी जास्त असल्याने वृद्ध व्यक्ती घरातच आहेत. त्यामुळे त्यांचा लोकांमध्ये मिसळण्याचा उत्साह मावळला आहे. यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होऊन छोट्या-छोट्या गोष्टींचेही विस्मरण होते. त्यामुळे अति ताण घेणे, चिंता करणे, लोकांमध्ये न मिसळणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

काय आहेत तक्रारी? आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे तरुणांमध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे नैराश्य, चिडचिडेपणा वाढला आहे. छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात न राहणे. झोप न येणे अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

तर याउलट वृद्धांचे म्हटले तर जुन्या गोष्टी लक्षात राहतात. मात्र, अलीकडच्या काळातील गोष्टी लक्षात राहत नाहीत. गृहिणींच्या तर दैनंदिन कामातील गोष्टींचा विसर पाडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय कराल? स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाचे व्यायाम करणे, पायी चालणे, प्राणायाम करणे, ध्यान करणे, पुस्तक वाचणे, वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडविणे.

तसेच हाताची कामे करीत राहणे कारण हाताचा आणि मेंदूचा थेट संपर्क आहे. जसे धान्य निवडणे, सुईत दोरा ओवणे यामुळे बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे आता मनाकडून शरीराकडे जाण्यापेक्षा शरीराकडून मनाकडे जाणे जास्त महत्त्वाचे आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.