लठ्ठपणा ठरू शकतो कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण; संसर्ग टाळण्याचा 'हा' आहे बेस्ट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 06:32 PM2020-06-17T18:32:45+5:302020-06-17T18:55:53+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर जास्त भीती व जास्त मृत्युदर हा इतर जीवनशैलीचे आजार असलेल्यांना आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या वाहिन्या रुंद असण्याचा आजार (इशेमिक हार्ट डिसीज), कॅन्सर, किडनीचे आजार जे मधुमेहामुळेच जास्त प्रमाणात होतात.

कोरोना संसर्ग झाला तर तो गंभीर व जीवघेणा होण्याची शक्यता ज्या या मुख्य पाच आजारांमध्ये आहे, त्या सर्वांच्या मुळाशी लठ्ठपणा हा प्रमुख आजार आहे. आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

आज आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यासाठीची औषधे शोधत आहोत. पण याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा आहे. मुळात कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांसाठी लठ्ठपणा हे एक कल्पवृक्षच असते.

आपल्या शरीरात लठ्ठपणा सुरू झाला आहे हे कसे ओळखायचे याचे प्रत्येकाला सहज मोजता येईल, असे एक माप बुलडाणा येथील लठ्ठपणा तज्ज्ञ (ओबेसिटी कन्सल्टंट) डॉ. विनायक हिंगणे सांगतात. डॉ हिंगणे यांच्या मते नाभीच्या खाली १ इंच म्हणजे २.५ सेंटिमीटर खाली पोटाचा घेर पुरुषांसाठी ९० सेंटीमीटर व स्त्रियांसाठी ८० सेंटिमीटर लठ्ठपणा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज दर्शवते.

खरे तर हे प्रमाण पुरुषांसाठी ७८ व स्त्रियांसाठी ७२ च्या पुढे गेले की जागरूक व्हायला हवे आणि जीवनशैली तपासून पाहायला हवी. पण आधीची

पुरुष : ९० व स्त्री : ८० ही मर्यादा मात्र जीवनशैलीत मोठे बदल करणे तातडीने आवश्यक ठरेल. कोरोनापासून बचावासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. हे खरी असले तरी घाबरून जाऊन एक महिन्यात अघोरी पद्धतीने वजन घटवणेही चुकीचे ठरेल.

त्यासाठी टप्प्याने प्रयत्न करून जीवनशैलीत बदल आवश्यक असतो. यात प्रामुख्याने आहार, व्यायाम, बैठी जीवनशैली सोडून हालचाल करणे, योग्य प्रमाणात झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन असे अशा अनेक गोष्टी असतात.

या लेखाचे लेखक डॉ. अमोल अन्नदाते हे बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.

(image credit- scmp.com)

Read in English