जबरदस्त! जीवघेणे व्हायरस आधीच ओळखता येणार; नवं तंत्रज्ञान माणसांसाठी संजीवनी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 06:38 PM2021-10-01T18:38:56+5:302021-10-01T18:45:16+5:30

माणसानं तयार केलेलं तंत्रज्ञान येणार कामी; विषाणूचा फैलाव होण्याआधीच ओळखता येणार

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली असून लाखो लोकांनी यामुळे जीव गमावला आहे.

जग अजूनही कोरोना संकटातून बाहेर आलेलं नाही. भारतात एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली. त्यानंतर तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर येत असल्यानं धोका कायम आहे. त्यातच भविष्यात असे आणखी जीवघेणे विषाणू येण्याची शक्यता असल्यानं सगळेच चिंतेत आहेत. या संकटापासून तंत्रज्ञान माणसाची मुक्तता करू शकतं. जीवघेणे विषाणू आधीच ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोलाची कामगिरी पार पाडू शकतं.

कोरोनासारख्या घातक विषाणूंची ओळख आधीच पटू शकते. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स महत्त्वाचं ठरू शकतं, असं ग्लास्गो विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आलं आहे. नॉर्ड्स मोलेंटेज, सायमन बाबयान आणि डॅनियल स्ट्रीकर यांनी याबद्दल संशोधन केलं.

प्राण्यांमधले कोणकोणते विषाणू माणसांना संक्रमित करू शकतात, याची माहिती जेनेटिक सामग्री असलेलं यंत्र देऊ शकतं. ग्लास्गो विद्यापीठात झालेलं संशोधन पीएलओएस बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालं आहे. त्यानुसार प्राण्यांमधील १० लाख ७० हजार विषाणूंची ओळख पटू शकते. हे विषाणू प्राण्यांमधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

२०१९ मध्ये कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये आढळला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या यंत्राच्या मदतीनं हा विषाणू ओळखता आला असता. तसं झालं असतं तर एकाही व्यक्तीचा जीव गेला नसता.

एखादा विषाणू एकाच जीनॉम सिक्वन्सिंगच्या माध्यमातूनच प्राण्यांमधून माणसांमध्ये प्रवेश करू शकतो का, यावर सध्या संशोधन सुरू आहे. ग्लास्गो विद्यापीठानं याबद्दल अधिक सखोल संशोधन करण्यासाठी लिव्हरपूल विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांचीदेखील मदत घेतली. विषाणूच्या जीनॉम सिक्वन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्या झुनॉटिक क्षमतेचा अंदाज लावता येतो, अशी माहिती नव्या अहवालातून समोर आली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्राच्या माध्यमातून विषाणूची ओळख आधीच पटल्यास त्यावर बारकाईनं लक्ष ठेवता येईल. त्यामुळे लसी विकसित करण्यावर लवकर काम सुरू करता येईल. त्यामुळे विषाणूचा फैलाव होण्याआधीच माणसांना सुरक्षित करता येईल, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

Read in English