Aryan Khan: वकील मुकुल रोहतगींचा मोठा दावा; “आर्यन खानकडून जबरदस्तीनं ड्रग्ज घेतल्याचं लिहून घेतलं”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:21 PM2021-10-29T12:21:50+5:302021-10-29T12:28:49+5:30

NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: NCB अधिकारी समीर वानखेडे यांना मिळालेल्या एका टीपने त्यांनी क्रुझवर छापेमारी करत शाहरुखच्या मुलासह ८ जणांना अटक केली होती.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबरला NCB नं ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आर्यनवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणी २८ ऑक्टोबरला आर्यन खानला मुंबई हायकोर्टातून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यन खानला आतापर्यंत ४ वेळा कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा जामीन नाकारण्यात आला होता. या प्रकरणात अनेक प्रसिद्ध वकील आर्यनच्या बाजूने कोर्टात बाजू मांडत होते. माजी अर्टॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना आर्यन खानची केस सोपवण्यात आली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने आर्यनला जामीन मंजूर केला.

आर्यनच्या जामीनाने शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. मात्र आता आर्यनची वकिली करणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी नवा दावा केला आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना मुकुल रोहतगी यांनी हायकोर्टाचा निर्णय आर्यनच्या बाजूने आला आणि त्याला जामीन मिळाल्याचं सांगितले.

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानची रिएक्शन काय होती? असा प्रश्न मुकुल रोहतगी यांना विचारताच ते म्हणाले की, आर्यन जेव्हापासून जेलमध्ये होता तेव्हापासून शाहरुख कायम या प्रकरणावर लक्ष ठेवून होता. प्रत्येक नोट्स तो काढत होता. जेवणही कमी केले. जामीन मिळाल्याचं ऐकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक बेकायदेशीर होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नव्हते. इतकचं नाही तर आर्यन खानची मेडिकल चाचणीही करण्यात आली नव्हती. आर्यन ड्रग्ज घेतो हे जबरदस्तीनं त्याच्याकडून लिहून घेण्यात आलं होतं असा दावा मुकुल रोहतगी यांनी केला आहे.

आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज नव्हतं. आर्यनने ड्रग्ज सेवन केले नव्हते. अटक करण्यापूर्वी का अटक केलीय हेदेखील सांगितले नाही. व्हॉट्सअप चॅट लीक करणं मुलभूत अधिकारांचं हनन होतं. उद्योगातून पैसा कमवायचा असता तर ड्रग्ज माफियाचा हिस्सा आहे असं म्हणता आलं असतं पण त्याला काहीच अर्थ नव्हता.

NCB नं आर्यन खानच्या अटकेचं कारणही सांगितलं नाही. जाणुनबुझून आर्यनकडून व्हॉट्सअप चॅट घेतले गेले. शाहरुख खानच्या मुलाकडे कुठल्या गोष्टीची कमी आहे म्हणून तो ड्रग्ज विकेल? एनसीबीने या प्रकरणाची हवा तयार केली. आर्यन खानने कुणाला धमकावलं नव्हतं असंही मुकुल रोहतगी म्हणाले.

आर्यन खान ड्रग्स घेत होता असे कुठलेही पुरावे NCB कडे नव्हते. व्हॉट्सअप चॅट मीडियात लीक केले गेले. क्रुझ ड्रग्ज प्रकरणाशी चॅटचं काही निगडीत नाही. २०-२२ वर्षाची पोरं व्हॉट्सअप बोलत असतात. त्यावरुन तो ड्रग्ज सप्लायर आहे असं बोलणार का?

ड्रग्ज विक्रीतून पैसा कमवावा हे आर्यन खानला करण्याची गरज नाही. या क्रुझवर १३०० लोकं होती. मग त्यातल्या १२० लोकांकडे ड्रग्ज मिळाले तर ते ड्रग्ज सप्लायर आहेत असं होतं का? ६ ग्रॅम ड्रग्ज सापडल्यावर जेलमध्ये कसं टाकलं जाईल. हा जामीनपात्र गुन्हा होता. मग २७ दिवस जेलमध्ये का? असा मुकुल रोहतगी म्हणाले.

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे वेगळे आहे. आर्यन खान प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाही. मलिक यांच्या जावयाला पकडलं गेले. ते समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहे. हा योगायोग आहे. परंतु आर्यन खान प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाही

Read in English