आधी कामाख्या देवीचं दर्शन, मगच...; सोनम रघुवंशीने राजासमोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:37 IST2025-06-11T15:26:40+5:302025-06-11T15:37:33+5:30

राजा आणि सोनम यांचे लग्न 11 मे रोजी झाले होते. यानंतर दोघेही 20 मे रोजी हनीमूनसाठी निघाले होते...

सध्या संपूर्ण देशभरात राजा रघुवंशी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर, साधारणपणे केवळ 10 दिवसांतच पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोनम रघुवंशीसंदर्भात सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत.

खरे तर, सोनमने हनीमूनसाठी नव्हे, तर राजाची हत्या करण्यासाठीच शिलॉन्गला जाण्याचा प्लॅन केला होता. मर्जीविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे सोनम नाखूश होती. यामुळेच ती राजाला आपल्या जवळ येण्यापासूनही रोखत होती.

माध्यमांतील वृत्तांनुसार, राजाला आपल्या जवळ येण्यापासून रोखण्यासाठी अथवा संबंध प्रस्थापित करण्यापासून रोखण्यासाठी तिने कामाख्या देवीच्या दर्शनाची अट ठेवली होती.

लग्नानंतर सोनम केवळ 4 दिवसच आपल्या सासरी अर्थात राजाच्या घरी राहिली. यानंतर ती माहेरी गेली. सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सोनमने सासरी असतानाच प्रियकर राजला मेसेज केला होता. यात, "राजासोबत संबंध प्रस्थापित करणे आपल्याला पसंत नाही," असे म्हणण्यात आले होते.

राजा आणि सोनम यांचे लग्न 11 मे रोजी झाले होते. यानंतर दोघेही 20 मे रोजी हनीमूनसाठी निघाले होते. खरे तर राजा या हनीमून ट्रिपसाठी तयार नव्हता. मात्र सोनमनेच राजाला या ट्रिपसाठी तयार केले होते आणि त्याला न सांगताच तिकिटही बूक केले होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, "आपण सर्वप्रथम कामाख्या देवीचे दर्शन घेणार आणि नंतरच संबंध प्रस्थापित करणार (लैंगिक संबंध), असे सोनमने राजाला सांगितले होते. तसेच, हत्येची तयारी करण्यासाठी आणि सुपारी किलर्स तेथे पोहोचण्यासाठी वेळ घालवण्याची तिची इच्छा होती. याशिवाय, राजाला संबंध प्रस्थापित करण्यापासूनही तिला रोखायचे होते. यासाठी ती अनेक कारणे सांगत होती.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आलेल्या सोनमला शिलॉन्ग पोलीस ट्रांझिट रिमांडवर घेऊन गेले आहेत. सोनम, तिचा प्रियकर राजा आणि इतर आरोपी यांची समोरासमोर बसवून चौकशी होऊ शकते. तेव्हा संपूर्ण सत्य समोर येऊ शकते.