छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:11 IST2025-08-05T15:04:48+5:302025-08-05T15:11:23+5:30

तुम्ही दिल्लीची लेडी डॉन जिकराबद्दल ऐकलं असेल. मस्तान टोळीचा भाग असलेली तीच मुलगी, जी सोशल मीडियावर बिनधास्तपणे शस्त्रे हाती घेत रिल्स बनवत असे. १७ एप्रिल रोजी एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे दुसरे कोणीही नाही तर जिकरा आणि तिचा भाऊ आहे असं पोलिसांच्या तपासात उघड झाले.
या मुलाने जिकराच्या धाकट्या भावावर हात उचलला होता तो लेडी डॉनला आवडला नाही. आता पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपपत्र तयार केले आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात अनेक खुलासे होत आहेत. हा खून खटला दिल्लीत सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा परिणाम आहे
इंस्टाग्रामवर हत्यारे दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या जिकराला तिच्या भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यायचा होता. यासाठी तिने एक महिना आधीच योजना आखली होती. इतकेच नाही तर तिने एक ऑटोमॅटिक पिस्तुल देखील खरेदी केली. ज्या पिस्तुलने ती सोशल मीडियावर बनवलेली रील पोस्ट केल्यामुळे तुरुंगात गेली होती. पण बदला घेण्याचा तिने हेतू सोडला नाही.
२२ वर्षांची जिकरा बऱ्याच काळापासून छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. तिला रील बनवण्याची खूप आवड आहे. ती एका २ वर्षाच्या मुलाची आई देखील आहे, पण ती तिच्या पतीपासून वेगळी राहते.
हाशिम बाबा नावाच्या एका गुंडाने तिला त्याच्या पत्नीसाठी बाउन्सर म्हणूनही ठेवले होते. नंतर ती मस्तान टोळीत सामील झाली. मस्तान टोळीचा बॉस शोएब मस्तान सध्या दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगात आहे. जिकराला डॉन बनायचे होते आणि ती अनेकदा हातात हत्यार घेऊन रील बनवायची. ती आणि तिचा धाकटा भाऊ साहिल शेजाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायचे.
आरोपपत्रानुसार, मार्चमध्ये हत्येचा कट रचण्यात आला होता आणि एक पिस्तूल खरेदी करण्यात आली होती. परंतु इंस्टाग्रामवर पिस्तूल दाखवून दहशत निर्माण केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी तिला अटक केली. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु तिला जामीन मिळाला होता.
तुरुंगातून बाहेर येताच तिने अवघ्या १० दिवसांत हत्येचा कट रचला. तिने मस्तान टोळीला सुपारी दिली होती. हे संपूर्ण प्रकरण मस्तान गँग आणि लाला गँगमधील टोळीयुद्धाचे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिकराचा भाऊ साहिल याला लाला गँगच्या सदस्यांनी मारहाण केली होती. त्यात १७ वर्षांचा मुलगाही होता.
मृत युवकाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध नव्हता. जिकराला फक्त तिच्या भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घ्यायचा होता. तिने मस्तान गँगच्या सदस्यांना त्याला मारण्याची सुपारी दिली होती.
१७ एप्रिल रोजी सकाळी मुलगा दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला परंतु सीलमपूरमध्ये रस्त्याच्या मधोमध त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हत्येमुळे परिसरात दहशत पसरली होती.
टोळीयुद्धाच्या या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी तपास केला तेव्हा सत्य समोर आले. पोलिसांनी जिकरा, तिचा भाऊ आणि इतर सहकाऱ्यांविरुद्ध पुरावे गोळा केले. ३०० पानांच्या आरोपपत्रात जिकरासह ७ जणांची नावे नोंदवण्यात आली आहेत.