Chinese Smartphone Companies : चिनी कंपन्या चीनला झटका देण्याच्या तयारीत! भारताला मिळू शकतो मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:30 PM2022-12-10T13:30:52+5:302022-12-10T13:38:18+5:30

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार येत्या काळात चिनी कंपन्याच चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पाहा नक्की काय आहे कारण.

येत्या काळात चिनी कंपन्याच चीनला मोठा झटका देण्याची शक्यता आहे. याचा भारताला खूप मोठा फायदा होऊ शकतो. एका रिपोर्टनुसार चिनी स्मार्टफोन ब्रँड Xiaomi, Oppo आणि Vivo ने मेड-इन इंडिया स्मार्टफोन्स इतर बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमालाही चालना मिळेल.

कंपन्यांच्या या पावलामुळे चिनी प्रकल्पांमधील मॅन्युफॅक्चरिंग आऊटपूट कमी होऊ शकतं. हा सरकारचा मोठा विजय असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तसंच पहिल्यांदाच चिनी स्मार्टफोन कंपन्या ग्लोबल प्रोडक्शन व्हॉल्युमला भारतासोबत शेअर करतील. यापूर्वी अनेक कंपन्यांनी याला नका दिला होता.

जर असं झालं तर मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजी शिफ्टवर याचा फरक येत्या काळात दिसून येईल असं मानलं जात आहे. रिपोर्टनुसार शाओमी, ओप्पो आणि विवो या कंपन्यांनी भारतात उत्पादन झालेल्या मोबाईल्सची निर्यात करण्याची योजना आखल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यापूर्वी सॅमसंग आणि ॲपलनंही भारतात तयार केलेल्या स्मार्टफोन्सची निर्यात करण्यास सुरूवात केली होती.

शाओमी, ओप्पो आणि विवो या कंपन्या भारतात तयार केलेले स्मार्टफोन्स आफ्रिका, मिडल इस्ट, लॅटिन अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतात. याशिवाय पाकिस्तानमध्येही याची निर्यात केली जाऊ शकते असंही त्यात म्हटलेय.

सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह स्कीममुळे या तीन कंपन्या हे पाऊल उचलू शकतात. या स्कीममध्ये स्थानिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अतिरिक्त फायदा दिला जातो. याचा फायदा सध्या ॲपल आणि सॅमसंगलाही मिळत आहे.

रिपोर्टमध्ये अनेक सोर्सचा हवाला देण्यात आला आहे. शाओमी, ओप्पो आणि विवो या कंपन्यांवर सरकारचा वाढता दबाव कामी आल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलंय. तसंच स्थानिक उत्पादन फर्म्स ऑप्टिमस इन्फ्राकॉम आणि डिक्सॉनची चर्चा या चिनी कंपन्यांशी सुरू आहे. सध्या याबाबात अधिक रिपोर्ट्सची वाट पाहावी लागेल.