OYO च्या रितेश अग्रवाल यांना 'शार्क' म्हणणं का आवडत नाही? सक्सेस स्टोरी शेअर करत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 08:40 AM2024-02-14T08:40:27+5:302024-02-14T08:46:30+5:30

शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सर्वांच्या पसंतीस येत आहे. यातील रिेतेश अग्रवाल हे सर्वांच्याच पसंतीस उतरलेले शार्क आहेत.

शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सर्वांच्या पसंतीस येत आहे. शोमधील 'शार्क'च्या बोलण्याकडे चाहत्यांचं सातत्यानं लक्ष असतंच. ओयो रुम्सचे (OYO Rooms) सीईओ रितेश अग्रवाल यांना या सीझनमध्ये खूप पसंत केलं जात आहेत. अलीकडेच रितेश यांनी ओयो सोबत आपली यशाची कहाणी सांगितली. त्यांना 'शार्क' म्हणवून घेणंही का आवडत नाही याबद्दलही त्यांनी सांगितलं.

रितेश यांनी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमशी बोलताना OYO सोबत त्यांची यशोगाथा शेअर केली आहे. जेव्हा ओयोची सुरुवात केली तेव्हा ते फक्त १८ वर्षांचे होते असं त्यांनी सांगितलं. नुकतेच हायस्कूल पास केलं होतं. अशा परिस्थितीत साहजिकच लोकांनी त्यांना सुरुवातीला गांभीर्यानं घेतलं नाही.

त्यावेळी रितेश जेव्हा ईमेल लिहायचे तेव्हा कोणीही प्रतिसाद देण्यास किंवा गुंतवणूक करण्यास तयार नव्हतं. शेवटी २०१५ मध्ये त्यांना एक मोठा गुंतवणूकदार सापडला. यापूर्वी जून २०१३ मध्ये रितेश यांनी गुरुग्राममधील एका हॉटेलमधून सुरुवात केली होती. ओयो येण्यापूर्वी त्यांची ऑक्युपेन्सी २० टक्के होती.

परंतु, काही महिन्यांतच त्यांची ऑक्युपेन्सी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढली. ती त्यांच्यासाठी सुरुवात होती. आज ओयो १७ हजार हॉटेल्स आणि १,५०,००० घरांना सेवा पुरवत आहे. अशा प्रकारे ही कंपनी फार मोठी झालीये. गेल्या काही वर्षांत रितेश यांना सातत्य राखण्याचं महत्त्व कळलं आहे. त्यांनी हार मानली नाही आणि हळूहळू त्यांच्यावर जास्त लोक विश्वास ठेवू लागले.

रितेश अग्रवाल हे मूळ दक्षिण ओडिशाचे रहिवासी आहेत. ते त्याच्या इंजिनीअरिंगची तयारी करत होते. पण, त्यांना ट्रॅव्हलिंगची आवड होती. अशाच एका अनुभवामुळे त्यांच्या कंपनीची सुरुवात झाली. पण, त्यावेळी शार्क टँक इंडियासारखं व्यासपीठाची गरज होती का असं विचारले असता, "मी जेव्हा सुरू केले तेव्हा शार्क टँकसारखे काही असतं तर बरं झालं असतं," असं ते म्हणाले.

काही लोक शार्क टँकला फाऊंडर्स आणि शार्कची भेट आणि गुंतवणूक मिळवण्याबद्दलचा शो म्हणून पाहू शकतात. पण मला वाटतं हा शो त्यापेक्षाही मोठा फरक करतो. कोट्यवधी लोक आता उद्योजकतेला संधी म्हणून पाहतात. लोक त्यांच्या राहत्या खोलीत फाऊंडर बनण्याचा प्रयत्न करत आहेत. जोखीम घेण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे. यामुळे भारत एक विकसित अर्थव्यवस्था बनू शकते, असंही ते म्हणाले.

रितेशने 'शार्क'बाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दलही सांगितलं. "मला वैयक्तिकरित्या शार्क म्हणवून घ्यायला आवडत नाही. मी बहुधा डॉल्फिनसारखा आहे. जेव्हा मी शोमध्ये येणार होतो तेव्हा माझं मोटिव्हेशन सिंपल होतं. मला फाऊंडर्सला सपोर्ट करायचा आहे. हे माझे ध्येय आहे. शार्क टँकने मला निराश केलं नाही. चांगल्या आयडिया या मौल्यवान असतात. पण, त्याहूनही महत्त्वाचा असतो तो म्हणजे कंपनीचा फाऊंडर आणि त्यामागील व्यक्ती," असं रितेश अग्रवाल म्हणाले.