स्वस्तात घर बांधण्याची हीच योग्य वेळ; महाराष्ट्रात लोखंडी सळ्या ३००० नी स्वस्त झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:23 AM2023-12-25T10:23:18+5:302023-12-25T10:25:56+5:30

प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे असे वाटत आहे. परंतु ही महागाई पाहता घर बांधणे तेवढे सोपे आणि स्वस्त राहिलेले नाहीय.

लोकसंख्या वाढत आहे, कुटुंब वेगळी होत आहेत. अशातच प्रत्येकाला आपले स्वत:चे घर असावे असे वाटत आहे. परंतु ही महागाई पाहता घर बांधणे तेवढे सोपे आणि स्वस्त राहिलेले नाहीय. घराला मजबुती देणारे सिमेंट, वाळू आणि लोखंडी सळ्या हे घटक महाग झालेले आहेत. परंतु सळ्यांचा रेट पाहिला तर ते गेल्या काही महिन्यांत जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाल्या आहेत.

अनेकदा लोक दर कमी होतात का याची वाट पाहत असतात. हीच वेळ आहे घर बांधायला सुरुवात करण्याची. नवीन वर्षाची चाहूल लागली आहे, त्यातच देशभरात सळ्यांची किंमत कमी झाली आहे. यामुळे सळ्यांवर होणारा मोठा खर्च आपोआपच कमी होणार आहे. २०२३ च्या अखेरच्या महिन्यात सळ्यांची किंमत देशभरात दोन ते तीन हजारांनी कमी झाली आहे.

कानपूरमध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीला 47,000 रुपये प्रति टन लोखंडी सळ्यांची किंमत २२ डिसेंबरला 45,700 रुपये प्रति टनावर आली आहे. रायपुरमध्ये 43,000 रुपयांवर आली आहे. महाराष्ट्रात (जालना) जुलैमध्ये लोखंडी सळ्यांची किंमत 51,200 रुपये/टन होती. ती आता 48,200 रुपये/टन एवढी घसरली आहे. हा फरक सुमारे ३००० रुपयांचा आहे.

२०२२ मध्ये लोखंडी सळ्यांची किंमत गगनाला भिडली होती. लोखंडी सळ्या या काळात 78,800 रुपये प्रति टन एवढ्या चढ्या दराने विकल्या जात होत्या. त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जात होता. यामुळे या 93,000 रुपये प्रती टन एवढ्या प्रचंड दराने घ्याव्या लागत होत्या. आताचा दर पाहता यात जवळपास ४० टक्के घट झाली आहे.

नवीन वर्षामध्ये सिझन येत असल्याने लोखंडी सळ्यांसह, सिमेंट, विटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अजून कमी होण्याची वाट पाहत असाल तर नुकसानच होण्याची शक्यता आहे. दर वाढले तर तुमच्या खिशातून जादा पैसे द्यावे लागतील. किंवा घर बांधण्याचे काम तुम्हाला पुढे ढकलावे लागेल.

घर बांधतेवेळी एकाच दमात झाले तर ठीक नाहीतर रखडले तर त्याचा खर्च वाढत जातो. तसेच फर्निचर, इंटेरिअर करताना एकाचवेळी करावे. नाहीतर ते मॅच होत नाही व अस्ताव्यस्त दिसते. यामुळे योग्य पैशांचे नियोजन करूनच घर बांधण्यास हात घालावा. थोडे थोडे करून बांधल्यास त्या घराला रुप येत नाही. हा अनेकांचा अनुभव आहे.