सर्वसामान्यांच्या खिशावर वाढू शकतो महागाईचा बोजा, अर्थ मंत्रालयाची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:43 AM2023-07-07T10:43:40+5:302023-07-07T10:55:26+5:30

एल निनोचा प्रभाव वाढल्यास देशातील ग्राहकांसाठी परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक आढाव्यात म्हटलंय.

गेल्या काही दिवसांपासून भाज्या, डाळी, टॉमेटो, तांदूळ, गहू यांच्या किंमतीत वाढ होताना दिसतेय. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडतोय. दरम्यान, यावरून आता अर्थमंत्रालयाचीही चिंता वाढलीये.

एल निनोचा प्रभाव वाढल्यास देशातील ग्राहकांसाठी परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. म्हणजेच खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असं अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक आर्थिक आढाव्यात असे म्हटलं आहे.

भारताची अर्थव्यवस्था उत्तम व्यवस्थापनामुळे स्थिर झाली असली तरी आव्हानं अजूनही कायम आहेत. विशेष म्हणजे यावेळी टोमॅटोसह अनेक भाज्यांचे भाव वाढले आहेत. डाळी, तांदूळ आणि गहू यांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारला मोठा संघर्ष करावा लागत आहे.

अर्थ मंत्रालयाच्या मे महिन्याचा मासिक आर्थिक आढावा आणि २०२३ च्या वार्षिक पुनरावलोकन अहवालात असं म्हटलंय की विकासाच्या गतीला अडथळा आणणाऱ्या घटकांमध्ये भू-राजकीय तणाव वाढणे, जागतिक वित्तीय व्यवस्थेतील अस्थिरता, जागतिक शेअर बाजारातील घसरणीचा कल, एल निनोची उच्च तीव्रता आणि व्यापारातील मंदीचा समावेश आहे.

अहवालानुसार, जगभर पसरलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानांमध्ये आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्ट ठरले आहे. भारताच्या आर्थिक स्थैर्य वाढवण्यात यानं खूप मोठं योगदान दिलं आहे आणि आज आपला देश इतर देशांच्या तुलनेत वेगाने विकसित होण्याच्या मार्गावर आहे.

महागाईचा दबाव कमी करण्यासाठी सरकार शुल्कात कपात करू शकते आणि कल्याण योजनांवरील खर्च वाढवू शकते, असं अहवालात सुचवण्यात आलं आहे. याशिवाय, ज्यामुळे आज खासगी गुंतवणूक आणण्यास मदत होत आहे अशा भांडवली खर्चासाठी वाढीव तरतूद सरकार करू शकतं.

गेल्या आर्थिक वर्षात सुरू झालेला भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग २०२३-२४ मध्येही कायम राहील. सर्व आकडेवारी याकडे कल दाखवत आहेत. शहरी भागातील मागणी मजबूत आहे. वाहन विक्री, इंधनाचा वापर आणि UPI व्यवहारातील तेजी कायम आहे. तसंच, मजबूत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीसह ग्रामीण मागणीही मार्गावर आहे.

देशातील तांदळाच्या किमती नऊ टक्क्यांच्या वाढीसह पाच वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. एल निनोमुळे यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता असून त्यापूर्वीच तांदळाचे भाव वाढू लागलेत. अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) ग्लोबल राईस प्राईज इंडेक्स ११ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. भविष्यातही त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

उल्लेखनीय म्हणजे, जगातील तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे आणि तो सर्वात स्वस्त पुरवठादार देखील आहे. देशात अधिकाधिक भात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. गेल्या महिन्यात, सरकारनं नवीन हंगामाच्या सामान्य तांदळाच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किमतीत ७ टक्क्यांची वाढ केली.