सुकन्या समृद्धी, पीपीएफमध्ये ३१ मार्चपर्यंत पैसे जमा न केल्यास लागणार पेनल्टी, काय म्हणतो नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:25 AM2024-02-26T10:25:54+5:302024-02-26T10:31:30+5:30

...अन्यथा तुमचं खातंही गोठवलं जाऊ शकतं, पाहा काय म्हणतो नियम.

सुकन्या समृद्धी योजना (SSY), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधील गुंतवणूकदारांना त्यांची खाती सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रक्कम जमा करावी लागते. ही किमान वार्षिक रक्कम जमा न केल्यास झाल्यास खातं गोठवलं जाऊ शकतं आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो.

चालू आर्थिक वर्षासाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस खात्यांमध्ये किमान रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. त्याचा संबंध कर आकारणीशीही आहे. वास्तविक, सरकारनं नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक केली आहे.

या अंतर्गत १ एप्रिल २०२३ पासून आयकर स्लॅबमध्ये बदल करून बेसिक एक्झम्पशन लिमिट २.५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर दायित्व नाही.

जे लोक आधीपासूनच पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि एनपीएस सारख्या कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांनी कदाचित नवीन कर प्रणालीकडे स्विच केलं असेल किंवा ते करण्याची योजना आखली असेल. तसं असल्यास, त्यांना या योजनांमधील गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकणार नाहीत.

अशा लोकांना असंही वाटू शकतं की त्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची किंवा डिपॉझिट करण्याची गरज नाही. दरम्यान, या खात्यांमध्ये किमान रक्कम जमा न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो. दंड टाळण्यासाठी, प्रत्येक योजनेसाठी किमान किती रक्कम जमा करावी लागेल हे जाणून घेऊ.

SSY योजनेसाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान २५० रुपये जमा करण्याची गरज आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, खातं डीफॉल्ट खातं मानलं जातं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी डीफॉल्टच्या प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट शुल्क भरावं लागेल. हे प्रत्येक वर्षाच्या डिफॉल्टसाठी किमान २५० रुपयांच्या योगदानासह भरावं लागेल.

PPF नियम २०१९ नुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये जमा करणं आवश्यक आहे. किमान रक्कम जमा न केल्यास, पीपीएफ खातं निष्क्रिय होतं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी, प्रत्येक वर्षासाठी ५० रुपये डीफॉल्ट फी वार्षिक किमान रक्कम ५०० रुपयांसह भरावी लागेल.

गुंतवणूकदारांना प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांच्या एनपीएस खात्यात किमान १,००० रुपये जमा करावे लागतात. ही किमान रक्कम जमा न केल्यास खातं गोठवलं जातं. फ्रीझ खातं सक्रिय करण्यासाठी एकरकमी किमान ५०० रुपये योगदान दिलं जाऊ शकते. खातं सक्रिय ठेवण्यासाठी प्रति आर्थिक वर्षात किमान १ हजार रुपये योगदान आवश्यक आहे.