पतंजलीचं टार्गेट सेट, बाबा रामदेव पुढील ५ वर्षांत १ लाख कोटींचा व्यवसाय करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:30 AM2023-06-17T11:30:25+5:302023-06-17T11:47:28+5:30

पतंजली समूहाने पुढील पाच वर्षांत आपला व्यवसाय एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पतंजली समूहाने पुढील पाच वर्षांत आपला व्यवसाय एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी उत्पादनम बाजारात आणण्याचा मानस व्यक्त केलाय. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्राहकांच्या समूहापर्यंत पोहोचण्याची योजना सुरू असल्याचं बाबा रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

दरम्यान, खाद्यतेलाबाबतचं अवलंबित्व संपवण्याचा मानस बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. मलेशिया, इंडोनेशिया, आफ्रिकन देश, अमेरिकन देश, युक्रेन, रशिया या देशांतून खाद्यतेलाची आयात करावी लागत असल्यानं देशाचे दीड ते दोन लाख कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. खाद्य तेल आपल्याला आयात करावं लागत आहे. अन्य देशांवरील अवलंबित्व संपलं पाहिजे हा आमचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत आता मोठ्या प्रमाणात धान्य आणि दुधाचं उत्पादन करतो. यासाठी तो इतर देशांवर अवलंबून नाही. त्याचप्रमाणे डाळींमध्येही इतरांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. आता हे मिशन खाद्यतेलासाठीही पूर्ण करायचे आहे. पतंजलीची उलाढाल पुढील पाच वर्षांत 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, जे सध्या 45,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, असंही ते म्हणाले.

समुहाची कंपनी पतंजली फूड्स (पूर्वीची रुची सोया) 1 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पतंजली समूहाचा व्यवसाय पुढील पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येणार आहे. त्याच वेळी, पतंजली फूड्सची सूचीबद्ध कंपनीचा व्यवसाय देखील 50,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा मानस असल्याचे बाबा रामदेव म्हणाले.

पतंजली समूहाचा व्यवसाय सुमारे 45,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि समुहानं आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना मागे टाकलं आहे. समूह पतंजली आयुर्वेदच्या माध्यमातून परवडणारी उत्पादने पुरवत आहे आणि आता पतंजली फूड्सच्या माध्यमातून उच्च-मध्यम वर्गाला लक्षात घेऊन उत्पादनं सादर करणार आहे. जगातील सुमारे 200 देशांतील सुमारे दोन अब्ज लोकांपर्यंत या समूहाची पोहोच आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत पामतेलची लागवड करणारे 40 हजार शेतकरी पतंजलीमध्ये सामील झाले आहेत. येत्या काळात त्यांची संख्या 5 लाखांपर्यंत वाढवायची आहे. अशा स्थितीत पतंजलीमध्ये पाम तेलाचे उत्पादन सुरू केल्यानंतर 5 लाख शेतकऱ्यांना थेट रोजगार मिळणार आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, शेतकरी एका खास प्रकारच्या पाम तेलाची लागवड करतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन मिळणार आहे. पाम तेलाच्या या नवीन जातीचे वयही पूर्वीपेक्षा जास्त आहे. आता त्याची लागवड सुरू केल्यानंतर तुम्ही 40 वर्षांपर्यंत पिके घेऊ शकता.

दरम्यान, भारतात पाम तेलाचा वापर खूप जास्त आहे. पाम तेलाचा हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारतात पाम तेलाचा वापर दरवर्षी 9 दशलक्ष टन आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी 40 टक्के वाटा पाम तेलाचा आहे.