Indian Economy: देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स शक्य! नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 11:51 AM2021-07-02T11:51:56+5:302021-07-02T12:00:51+5:30

Indian Economy: GST दिनानिमित्त आयोजित एका विशेष वेबिनारमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी इंधनदरवाढीची समस्या, पेट्रोल-डिझेलवर पर्याय, देशाचा विकास याबाबत आशावादी विधाने करताना पाहायला मिळत आहेत.

इथेनॉलच्या वापरामुळे पेट्रोल-डिझेलला चांगला पर्याय उपलब्ध होऊन इंधनामध्ये बचत होण्यासाठी एक उत्तम योजना आखली जात असून, पुढील तीन महिन्यात त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

नितीन गडकरींनी सांगितलेल्या या योजनेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न साध्य होऊ शकते, अशी आशा नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे.

जीएसटी दिनानिमित्त आयोजित एका विशेष वेबिनारमध्ये, जीएसटीचा प्रवास आणि भविष्यातील वाटचाल-आत्मनिर्भर भारत या विषयावर बोलताना नितीन गडकरी यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

वस्तू आणि सेवा करामुळे (GST) भारतीय अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

एक देश, एक बाजारपेठ, एक कर, या विचारातून जीएसटीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या महामारीच्या काळातही व्यापार-उद्योगाला त्यामुळे मदत मिळाली.

पुढेही ही प्रणाली सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाली. या चार वर्षात, व्यवसाय उद्योग चालवण्याच्या पद्धतीत, लक्षणीय बदल झाल्याचे दिसत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

डिजिटलीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाचीही यात अत्यंत महत्वाची भूमिका आहे. पारदर्शक आणि कालबद्ध निर्णयप्रक्रिया सुनिश्चित होण्यासाठी, वित्तीय लेखापरीक्षणासोबतच, कामगिरीचे परीक्षण होणेही अत्यंत महत्वाचे आहे, असे गडकरींनी यावेळी बोलताना नमूद केले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे थकीत/प्रलंबित पेमेंट सर्वाधिक चिंतेचे कारण असून ही समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.जीएसटी ने चार वर्षे पूर्ण केली असली तरीही, आजही, त्यात सुधारणा करण्यास वाव आहे.

या प्रणालीशी संबंधित सर्व घटकांकडून सहकार्य, समन्वय, संपर्क आणि सुधारणेची अपेक्षा आहे, असे सांगत देशभरातील विषयांवर नियमितपणे वेबिनार्स, सेमिनार्स, विविध अभ्यासक्रम आयोजित करत असल्याबद्दल गडकरींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान, इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या ३ महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

स्थानिक शेतमालाचा वापर करून तयार होत असलेल्या इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल व डिझेल या पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व यामुळे कमी होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी यावेळी व्यक्त केला.

ब्राझील, अमेरिका आणि कॅनडा या देशांतून फ्लेक्स इंजिनाचा वापर सुरू झाला आहे. यामुळे तेथे बीएमडब्ल्यू, मर्सिडिज आणि टोयाटो या कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिनाची निर्मिती करणे भाग पडले आहे.

स्थानिक पातळीवर शेतमालापासून बनवलेले इथेनॉल इंधन म्हणून वापरणे हे भारतासारख्या देशाला निश्चितच परवडणारे आहे. त्यामुळे कच्च्या खनिज तेलाची आयातही कमी करण्यात यश येऊ शकेल.

यामुळे खर्च कमी होईल आणि प्रदुषणही कमी होईल. एक लीटर पेट्रोल १०० रुपयांना मिळत असेल, तर त्या तुलनेत एक लीटर इथेनॉल ६० ते ६२ रुपयांना मिळते, याकडे नितीन गडकरींनी यावेळी लक्ष वेधले.

Read in English