सुसाट प्रवासाची मोठी किंमत! देशातील 'हे' ५ टोल प्लाझा आहेत सर्वात महागडे! महाराष्ट्रात किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:34 IST2026-02-19T16:00:00+5:302026-02-19T16:34:06+5:30
Toll Plaza : २०२६ मध्ये भारतातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली असली, तरी टोलच्या वाढत्या दरांनी प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देखभालीचा खर्च आणि महागाई लक्षात घेऊन टोल दरांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता अनेक टोल प्लाझावर कारसाठी एका बाजूचा प्रवास १५० ते ३०० रुपयांच्या पार गेला आहे.

खालापूर टोल (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे) : हा भारतातील सर्वात महागडा सिंगल-पॉईंट टोल प्लाझा असून, येथे कारसाठी एका प्रवासाचे ३२० रुपये आकारले जातात. घाटातील रस्ते आणि हाय-स्पीड मार्गाच्या देखभालीमुळे येथील शुल्क देशात सर्वाधिक आहे.

अटल सेतू (मुंबई-नवी मुंबई) : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर २१.८ किमी प्रवासासाठी कार चालकांना २५० रुपये मोजावे लागतात, जो भारतातील सर्वात महागडा समुद्री मार्ग आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासाच्या वेळेत होणारी मोठी बचत यामुळे हे शुल्क आकारले जाते.

शेषागिरीहल्ली टोल (बेंगलुरू-मैसूर) : कर्नाटकचा हा एक्सप्रेसवे दक्षिण भारतातील सर्वात महागडा मार्ग बनला असून येथे कारसाठी १७० रुपये शुल्क आहे. हाय-स्पीड कॉरिडॉर आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे महाग असूनही प्रवासी याच मार्गाला अधिक पसंती देत आहेत.

सैदपूर टोल (दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे) : दिल्ली ते मेरठ या प्रवासासाठी कार चालकांना सुमारे १६० रुपये मोजावे लागतात, जे उत्तर प्रदेशातील प्रमुख महागड्या टोलपैकी एक आहे. अवघ्या ४५ मिनिटांत मेरठला पोहोचण्याच्या सुविधेमुळे लोक हे महागडे शुल्क भरण्यास तयार असतात.

यमुना एक्सप्रेसवे (नोएडा-आग्रा) : ग्रेटर नोएडा ते आग्रा दरम्यानच्या जेवर आणि मथुरा टोलवर कारसाठी १५० ते १६५ रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. सुरक्षा वैशिष्ट्ये आणि रस्ते सुधारणेसाठी २०२६ मध्ये येथील दरांमध्ये अल्पशी वाढ करण्यात आली आहे.


२०२६ मध्ये दिल्ली-मेरठ आणि बेंगलुरू-मैसूर या मार्गांवर 'GPS आधारित' आणि 'ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन' यांसारख्या आधुनिक टोलिंग सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली जात आहे. यामुळे अंतरानुसार नेमके पैसे कट होतील आणि टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल.

















