आताच करा रिटायरमेंट प्लॅन; LIC च्या 'या' योजनेत गुंतवणूक करुन महिन्याला मिळवा रु. 26000

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 10:06 PM2024-04-07T22:06:55+5:302024-04-07T22:16:37+5:30

योग्य वयात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो.

LIC Scheme: आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि चांगला परतावादेखील मिळतो. निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी तरुणपणी गुंतवणूक करणे फायद्याची ठरते. तुम्हीदेखील चांगला परतावा देणाऱ्या आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर LIC ची 'जीवन शांती' योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.

यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करू शकता आणि पेन्शनची सुविधा त्वरित मिळवू शकता. या योजनेत तुम्हाला चांगला परतावा तर मिळतोच, यासोबतच तुमचे पैसे सुरक्षित राहतात. विशेष म्हणजे, या योजनेत तुम्हाला जीवन विम्याचाही लाभ मिळतो. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित राहते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत कमाल मर्यादा नाही. मात्र किमान रक्कम 1.5 लाख रुपये असायला हवी.

काय आहे जीवन शांती योजना? ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे, म्हणजेच तुम्ही एकाच वेळी रक्कम भरुन या योजनेचा लाभ घेऊ शकता. यानंतर LIC तुम्हाला आयुष्यभर ठराविक अंतराने नियमित रक्कम देत राहील. तुम्ही ही रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेऊ शकता. या नियमित देयक रकमेला वार्षिकी म्हणतात. या योजनेत तुम्हाला दोन पर्याय मिळतील, पहिला तात्काळ वार्षिकी आणि दुसरा स्थगित वार्षिकी.

इमीडिएट आणि डिफर्ड अॅन्युइटी-इमीडिएट ॲन्युइटीमध्ये गुंतवणूकदाराला लगेच पेमेंट मिळू लागते. तुम्ही एकरकमी पैसे भरुन योजना घेतल्यास निवडलेल्या पेमेंट कालावधीनुसार तुम्हाला पैसे मिळू लागतात. जर तुम्ही मासिक पेमेंट निवडले असेल, तर तुम्हाला पहिल्या महिन्यापासून पेमेंट मिळेल. डिफर्ड ॲन्युइटीमध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम भरून योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला ठराविक वर्षांनी पेमेंट मिळू शकते. ज्यांना तरुण वयात गुंतवणूक करून म्हातारपण सुरक्षित करायचे आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.

कोण गुंतवणूक करू शकतो? LIC च्या या योजनेत तुम्ही 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर पेन्शन सुरू करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पेन्शन सुविधेचा तात्काळ लाभही घेऊ शकता. ही पॉलिसी घेणाऱ्याचे वय किमान 30 वर्षे असणे आवश्यक आहे. जीवन शांती योजनेत किमान 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

पेन्शन कशी मिळवायची? जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये 20 वर्षांसाठी गुंतवले, तर तुम्हाला दरमहा 26 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. जर तुम्हाला ती वार्षिक घ्यायची असेल, तर सुमारे 3.12 लाख रुपये मिळतील. या योजनेत मृत्यू लाभ देखील उपलब्ध आहे. गुंतवणुकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आणि नॉमिनीला इतर लाभांसह पेन्शन दिली जाते.