५% व्याजावर ₹३ लाखांपर्यंतचं कर्ज, ₹१५००० ची मदत; सरकारची आहे 'ही' जबरदस्त स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 09:04 AM2024-03-18T09:04:36+5:302024-03-18T09:11:52+5:30

सरकारनं अशा अनेक योजना सुरू केल्या ज्यांचा गरीब वर्गाला फायदा होत आहे.

PM Vishwakarma Yojana: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात येईल. मोदी सरकारनं दुसऱ्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या ज्यांचा गरीब वर्गाला फायदा होत आहे.

मोदी सरकारची यापैकीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. १७ सप्टेंबर २०२३ रोजी पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली. ज्याचा उद्देश हात आणि अवजारांचा वापर करून काम करणाऱ्या कारागिर आणि शिल्पकारांना मदत मिळवून देणं हा होता.

या योजनेअंतर्गत १८ व्यवसायांची ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, केस कापणारे, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीर लाभार्थी असणार आहेत.

पारंपरिक कारागिरांच्या उत्पादनांची गुणवत्ता, व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचे मूल्यसाखळीतील एकत्रिकरण करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. ही योजना संपूर्णपणे भारत सरकार अर्थसहाय्यित आहे.

प्रारंभी १८ पारंपरिक व्यवसायांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पारंपरिक कारागिरांना मूलभूत व अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल. ही योजना पात्र लाभार्थींना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, टूलकिट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता यासह सवलतीचे आणि तारणमुक्त कर्ज, डिजीटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि विपणन सहाय्य करेल. या योजनेचा कालावधी पाच वर्षे राहील.

‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यातील १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना बँकेतून विनातारण अर्थसहाय्य मिळणार आहे. लाभार्थीला कर्जाच्या पहिल्या हप्त्यात दीड वर्षासाठी एक लाख रूपये तर दुसऱ्या हप्त्यात ३० महिन्यांसाठी २ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.यासाठी कारागिरांना प्रथम पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

त्यामध्ये प्रशिक्षणार्थीला दररोज ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कारागिरास १५ हजार रुपयांपर्यंत साहित्य किंवा तेवढी रक्कम दिली जाणार आहे. एकूणच गरीब, गरजू पारंपरिक कारागीर व पारंपरिक व हस्तकलेला सर्वांगीण आधार देणारी ही योजना आहे.