Pak Asia Cup 2025: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:13 IST2025-09-17T15:00:23+5:302025-09-17T15:13:40+5:30

Ind Vs Pak Asia Cup: २०२५ च्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला सात विकेट्सनं हरवलं, पण खरा वाद पाकिस्ताननं सामन्यानंतर सुरू केला. यातून बाहेर पडल्यास पाकिस्तानला कोट्यवधींचं नुकसान होणार आहे.

२०२५ च्या आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला सात विकेट्सनं हरवलं, पण खरा वाद पाकिस्ताननं सामन्यानंतर सुरू केला. या सामन्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही.

ही बाब पाकिस्तानच्या जिव्हारी लागली. त्यांनी हा अपमान मानला आणि लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणीही केली, परंतु ICC नं ही मागणी फेटाळून लावली. महत्त्वाचं म्हणजे, ICC च्या प्रतिसादावर पीसीबीचे माजी CEO आणि आता ICC चे महाव्यवस्थापक वसीम खान यांनी स्वाक्षरी केली होती.

या निर्णयामुळे पाकिस्तान आणखी संतापला आहे. जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पीसीबी आता २०२५ च्या आशिया कपमधून माघार घेण्याची धमकी देत ​​आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की जर पाकिस्ताननं खरोखरच या स्पर्धेवर बहिष्कार घातला तर त्याचे किती पैशांवर पाणी सोडावं लागेल?

एका अहवालानुसार, जर पाकिस्तानने २०२५ च्या आशिया कपवर बहिष्कार टाकला तर त्यांना १६ मिलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे १४० कोटी रुपयांचं थेट नुकसान होईल. पीसीबी आधीच आर्थिक अडचणींशी झुंजत आहे आणि ही रक्कम त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. पाकिस्ताननं माघार घेतल्यास केवळ आर्थिक नुकसान होणार नाही तर खेळाडूंचे पगार, देशांतर्गत स्पर्धा आणि इतर तयारींवरही परिणाम होईल.

जेव्हा सामना कर्णधार सूर्यकुमार यादवला हा निर्णय स्पोर्ट्समनशिपच्या विरोधात आहे का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं स्पष्ट उत्तर दिलं की, "काही गोष्टी खेळाच्या भावनेपेक्षा वरच्या असतात." सामन्यानंतर तो म्हणाला, "आम्ही हा विजय पुलवामा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आणि आमच्या सशस्त्र दलांना समर्पित करतो."

हा निर्णय त्याचा एकट्याचा नव्हता, तर सरकार आणि बीसीसीआय दोघांचाही पाठिंबा होता. आम्ही फक्त खेळण्यासाठी आलो होतो आणि मैदानावर आमचं उत्तर दिलं, असंही तो म्हणाला.