दोन बड्या सरकारी कंपन्यांची संपत्ती विकण्याच्या प्रयत्नांना थंड प्रतिसाद; पुन्हा बोली प्रक्रिया होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:48 PM2022-02-09T19:48:41+5:302022-02-09T19:56:17+5:30

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या बोली प्रक्रियेला सरकारला थंड प्रतिसाद मिळाला होता.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (MTNL) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या नॉन-कोअर मालमत्तांचा लिलाव करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला सरकारला थंड प्रतिसाद मिळाला. अशा स्थितीत सरकारने आता या मालमत्तांसाठी पुन्हा बोली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

"मुंबईतील काही फ्लॅटसाठी काही निविदा आल्या आहेत, परंतु राजपुरा आणि हैदराबादमधील जमिनीसाठी कोणीही बोली लावली नाही. आम्ही या मालमत्तांसाठी पुन्हा बोली मागवू," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मनी कंट्रोलनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या सहा मालमत्ता MSTC पोर्टलवर ९७० कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावासाठी ठेवल्या होत्या. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) यांच्या नेतृत्वाखाली ही बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये हैदराबाद, चंदीगड, कोलकाता आणि भावनगरमध्ये चार मालमत्ता बीएसएनएलच्या होत्या. त्यांची एकूण मूळ किंमत सुमारे ६०० कोटी रुपये होती. त्याच वेळी, दोन मालमत्ता एमटीएनएलच्या होत्या, एक मुंबईतील गोरेगाव परिसरात आणि दुसरी वसारी हिल येथील होती. या दोन मालमत्तांची एकूण मूळ किंमत ३१० कोटी रुपये होती.

२०१९ मध्ये, सरकारने BSNL आणि MTNL साठी ६८,००० कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज जाहीर केले होते. नॉन-कोअर प्रॉपर्टीज विकण्याचा निर्णय हा या पुनरुज्जीवन योजनेचा एक भाग होता.

सरकारने CBRE साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, JLL प्रॉपर्टी कन्सल्टन्ट्स (India), कुशमॅन अँड वेकफील्ड अँड नाईट फ्रँक (India) प्रायव्हेट लिमिटेड यांना विक्री प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

MTNL दिल्ली आणि मुंबई येथे दूरसंचार सेवा पुरवते, तर BSNL ही शहरे वगळता संपूर्ण देशात दूरसंचार सेवा पुरवते. या सहा मालमत्तांच्या विक्रीतून दूरसंचार विभागाला ३ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.

टाटा समूहाला एअर इंडियाची विक्री केल्यानंतर सरकारने अन्य सरकारी कंपन्यांच्या मोकळ्या जमिनी आणि इतर मालमत्तांच्या विक्रीचे प्रयत्न वाढवले ​​आहेत. यासाठी नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन (NLMC) ची स्थापना करण्यात आली आहे.

MTNL, BSNL, भारत पेट्रोलियम, ब्रिज अँड रूफ कंपनी, BEML आणि HMT यांच्या मालकीची एकूण ३४००० एकर जमीनीची विक्रीसाठी ओळखण्यात पटवण्यात आली आहे. या जमिनींच्या विक्री प्रक्रियेवर NLMC देखरेख करेल.