ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत मोदी सरकारसाठी आल्या या 3 ‘गुड न्यूज’, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:02 PM2023-10-03T16:02:31+5:302023-10-03T16:06:38+5:30

केंद्रातील मोदी सरकारसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय सकारात्कम झाली आहे.

केंद्रातील मोदी सरकारसाठी(Modi Govt) ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय सकारात्कम झाली आहे. एकापाठोपाठ एक तीन चांगल्या बातम्या आल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे, GST संकलनात बंपर वाढ झाली आहे. दुसरी बातमी म्हणजे, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.09 टक्क्यांवर आला. तिसरी बातमी म्हणजे, जागतिक एजन्सी आणि तज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मकता दाखवली असून, गती कायम राहण्याची अंदाज वर्तवला आहे.

बेरोजगारी दर कमी झाला-देशातील बेरोजगारीचा दर एका वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत एक टक्क्याहून अधिक घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर ऑगस्ट 2023 मध्ये 8.10 टक्के होता, तर सप्टेंबर 2023 मध्ये तो 7.09 टक्क्यांवर आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागातही बेरोजगारी कमी झाली आहे. ग्रामीण बेरोजगारी ऑगस्टमधील 7.11 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 6.20 टक्क्यांपर्यंत घसरली, तर शहरी बेरोजगारीचा दर 10.09 टक्क्यांवरुन 8.94 टक्क्यांवर आला.

GST संकलनात मोठी वाढ-सप्टेंबर 2023 च्या GST संकलनाचे आकडे जाहीर करताना, वित्त मंत्रालयाने सांगितले की, भारतातील एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST संकलन वार्षिक आधारावर 10 टक्के वाढीसह 1.62 लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात जीएसटीमुळे सरकारी तिजोरी सातत्याने भरत आहे. सप्टेंबरमध्ये संकलन 1,62,712 कोटी रुपये होते, ज्यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 29,818 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) 37,657 कोटी रुपये, इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) 83,623 कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आणि सेस 11,613 कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या 881 कोटी रुपयांसह) होता.

अर्थव्यवस्थेचा वेग कायम राहील-एकीकडे जागतिक मंदीमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्था हादरल्या आहेत, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. जागतिक बँक असो, IMF किंवा इतर कोणतीही जागतिक एजन्सी असो किंवा भारतातील सर्वोच्च अर्थतज्ज्ञ असोत, सर्वजण भारताच्या आर्थिक विकासाबद्दल सकारात्मक आहेत. NITI आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी चालू आर्थिक वर्षातील देशाच्या आर्थिक विकास दराबाबत आपला अंदाज व्यक्त केला असून तो अंदाजे 6.5 टक्के असेल.

तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर-एकीकडे जीएसटी संकलन, बेरोजगारीचा दर आणि जीडीपी संदर्भात चांगली बातमी आली असताना, दुसरीकडे मंगळवारी S&P ग्लोबलने जारी केलेल्या मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय डेटाने निराशा केली आहे. भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ऑगस्टमधील 58.6 वरून सप्टेंबरमध्ये 57.5 वर घसरला. PMI लेबल सलग 27 व्या महिन्यात 50 च्या वर राहिले आहे. दरम्यान, भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या Ecowrap अहवालात म्हटले आहे की, भारताने आपली सध्याची गती कायम ठेवली, तर FY27-28 पर्यंत देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून टॅग मिळेल.