तेव्हा बँका होम लोन देत नव्हत्या; HDFC च्या पारेखांनी मोठे धाडस केले, म्हातारपणी बँक सुरु केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 04:07 PM2022-11-18T16:07:18+5:302022-11-18T16:12:38+5:30

पारेखनी लहानपणी चाळीत आपले आयुष्य जगले होते. स्वत:चे घर काय असते, याची जाणीव त्यांना तिथे झाली होती. त्यांचे आयुष्य खडतर प्रवासात गेले होते.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून आज जी HDFC बँक मिरवतेय ती काही एकाएकी यशस्वी झालेली नाही. एचडीएफसी बँकेची ज्यांनी स्थापना केली त्या हसमुखभाई पारेख ( Hasmukhbhai Parekh) यांची पुण्यतिथी आहे. १८ नोव्हेंबर, 1994 ला देशाने या महान व्यक्तीला गमावले. पारेख यांनी ऐन उमेदीच्या काळात नाही तर निवृत्त झाल्यानंतर म्हणजेच वयाच्या साठीनंतर HDFC Bankची सुरुवात केली होती.

करिअरच्या सुरुवातीपासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते आर्थिक गोष्टींशी निगडीत राहिले. सुरुवातीला ते आयसीआयसीआय या बँकेत नोकरीला होते. याच पारेखनी लहानपणी चाळीत आपले आयुष्य जगले होते. स्वत:चे घर काय असते, याची जाणीव त्यांना तिथे झाली होती. त्यांचे आयुष्य खडतर प्रवासात गेले होते.

याच पारेखांनी सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. पारेख यांचा जन्म १० मार्च १९११ ला सुरतला झाला होता. पारेख यांनी हुशारीच्या बळावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अभ्यास केला. यानंतर पुन्हा भारतात येऊन मुंबईच्या सेंट झेविअर्समधून डिग्री पूर्ण केली.

त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात स्टॉक ब्रोकिंग फर्म हरिकिशनदास लखमीदासमधून केली. 1956 ला ते ICICI बँकेत डेप्यूटी जनरल मॅनेजर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी तिथे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंतच्या पदावर पोहोचले. १९७६ ला ते बँकेतून रिटायर झाले. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे त्यांना वाटत होते. निवृत्तीनंतर त्यांनी यावरच काम करण्यास सुरुवात केली.

त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी हाउसिंग डेवलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ची सुरुवात केली. एचडीएफसी ही अशी बँक होती जी पूर्णपणे हाऊसिंग फायनान्ससाठी होती. पारेख यांनीच देशात होम लोन ही संकल्पना राबविली आणि यशस्वीही करून दाखविली. अनेकांनी त्यांचे हा पाऊल चुकीचे असल्याचे सांगितले होते. मात्र, याच पावलाने एचडीएफसीला शिखरावर नेउन ठेवले.

आयुष्यात एवढे मोठे यश मिळविले परंतू पारेख यांच्या हृदयाचा एक कप्पा मोकळाच राहिला. त्यांचे आयुष्य एकटेपणातच गेले. पत्नीचा अकाली मृत्यू झाला, मुलबाळही नव्हते. हसमुखभाई हे त्यांची पुतणी हर्षाबेन आणि पुतण्या दीपक पारेख यांच्यासोबत राहत होते. जाता जाता त्यांनी अनेकदा जगाला एक संदेश दिला होता. ''कोणावर तरी प्रेम करण्यापेक्षा त्याचे प्रेम समजून घेणे महत्त्वाचे आहे.'', असे ते नेहमी सांगायचे. 1992 मध्ये सरकारने त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.