Navratri 2021: नवरात्रारंभ: नवरात्र व्रत नेमके कसे आचरावे? ‘या’ गोष्टी माहिती असायलाच हव्या; पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:11 AM2021-10-06T08:11:21+5:302021-10-06T08:17:58+5:30

Navratri 2021: अनेक जण नवरात्रात देवीचे विशेष व्रत आचरतात. नवरात्र व्रताचे नियम (navratri vrat rules) माहिती असणे अत्यंत आवश्यक असून, ते काटेकोरपणे पाळावेत, असा सल्ला दिला जातो.

यंदाच्या वर्षी सन २०२१ मध्ये ०७ ऑक्टोबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत नवरात्र साजरे केले जाईल. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. (shardiya navratri 2021)

देवीची उपासना करण्यासाठी नवरात्राचा कालावधी उत्तम तसेच शुभ मानला जातो. अनेक जण नवरात्रात देवीचे विशेष व्रत आचरतात. काही जण प्रतिवर्षी हे व्रत करतात. मात्र, काही जण नैमित्तिक व्रताचरण करतात. (navratri 2021)

नवरात्र व्रताचे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. तसेच हे नियम काटेकोरपणे पाळावेत, असा सल्ला दिला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. मात्र, यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्रात विशेष व्रत आचरले जाते.

व्रताचरणामुळे तन, मन आणि आत्माशुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्माकडील कल वाढतो. आध्यात्मिक आवड निर्माण होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. नवरात्रातील व्रताचे शारीरिक, मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक लाभ मिळतात, असे म्हटले जाते. केवळ धार्मिकदृष्ट्या नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नवरात्रातील व्रताला विशेष महत्त्व आहे. (navratri vrat rules)

नवरात्रातील व्रताचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते. नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र, काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रातील ठराविक दिवशी व्रताचरण करावे. (always remember rules while keeping vrat during navratri)

पैकी घटस्थापना म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे, असे म्हटले जाते. व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे. केवळ फलाहारावर भर द्यावा. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा. व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही, असे सांगितले जाते.

नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्म मुहुर्तावर उठावे. अन्यवेळी सकाळपर्यंत झोपले, तरी चालते. मात्र, नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहुर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे. (navratri vrat rules in marathi)

यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण, जप, मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते. नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो, अशी मान्यता आहे.

नवरात्रातील व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले, तेलकट पदार्थांचा आहार करू नये, असे सांगितले जाते. व्रताच्या कालावधी बटाटा अधिक प्रमाणात खाल्यास शरीराचे स्थुलत्व वाढते, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते. यामुळे आळस वाढतो.

तसेच तळलेले, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात. याशिवाय कांदा, लसूण यांसारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे. नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस, सात्विक, पचायला सोपा, हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते.

नवरात्रातील काही गोष्टी करणे निषिद्ध वा वर्ज्य मानले गेले आहे. नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे, केस कापू नयेत, असे म्हटले जाते. कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये. वाणी संयमित आणि शांत ठेवावी. खोटे बोलू नये. कोणाचाही अनादर करू नये, असे सांगितले जाते. आंघोळीच्या पाण्यात नीम, गुलाबजल मिळसणे उपयुक्त मानले गेले आहे, असे सांगितले जाते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते, असे सांगितले जाते.