नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:57 IST2025-09-22T13:41:18+5:302025-09-22T13:57:35+5:30
Navratri 2025: अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नवरात्र कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते.

Navratri 2025: चातुर्मासात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत साजरा केला जाणारा एक मोठा उत्सव म्हणजेच नवरात्र. नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्यास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्राचा उत्सव हा एक कुलाचारही असल्याने त्यामध्ये विविधता दिसून येते. बंगालमध्ये काली देवीचे उपासक अधिक आहेत त्यामुळे तेथे हा नवरात्र-उत्सव विशेष प्रकारे साजरा केला जातो. या उत्सवास दुर्गापूजा वा पूजा-उत्सव म्हणतात.
यंदा २०२५ मध्ये २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. दुर्गा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन शुंभ-निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांशी नऊ दिवस युद्ध केले व त्यांचा वध केला. म्हणून हा नवरात्राचा उत्सव केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचे पूजन, व्रताचरण करतात. असे सगळे असले, तरी काही गोष्टींचे भान किंवा व्रतपूजनाचे नियम पाळणे आवश्यक असते, असे म्हटले जाते.
दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप-जाप, होम-हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. नवरात्रोत्सव कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते. अनावधानाने गोष्टी घडल्या, तरी दुर्गादेवीची नाराजी, अवकृपा, वक्रदृष्टी पडू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
कोणत्याही देवी-देवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र, नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे, असे सांगितले जाते. तसेच संपूर्ण नऊ दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. नवरात्रातील नऊही दिवस पूजा करताना काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर शक्यतो टाळावा, असे सांगितले जात आहे.
नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण नऊ दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा, असे म्हटले जाते. या नऊ दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल, त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये. अगदी साग्रसंगीत भोजन शक्य नसेल, तरीदेखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत, असे सांगितले जाते.
या नऊ दिवसात कोणाचाही अपमान करू नये. खोटे बोलू नये, खोटे वागू नये, असे म्हटले जाते. नवरात्र कालावधीत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा यांचे पठण आवर्जुन करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा, असे म्हटले जाते.
नवरात्राच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात, असे सांगितले जाते. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा, असे म्हटले जाते. देवीच्या नैवेद्यात विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची आदी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा, असे सांगितले जात आहे.
नवरात्रात देवीचे पूजन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. नवरात्र कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. या कालावधीत मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम चुकवू नयेत, असे सांगितले जाते. नवरात्रातील पूजनात सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे, असे सांगितले जात आहे.
नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस पूजन काळात लसूण, कांदा यांसारखे उग्र पदार्थ खाणे टाळावे. काही धार्मिक ग्रथांमध्ये कांदा-लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा, असे सांगितले जाते. नवरात्राचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्म मुहुर्तावर उठावे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्म मुहुर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे, असे म्हटले जाते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते, असे सांगितले जाते.
नवरात्रीत व्रताचरण करताना काही अनावधानाने काही चूक घडलीच, तर मनापासून देवीची क्षमायाचना करावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि काही मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.