Lunar Eclipse 2021: सन २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण; ५८० वर्षांनंतर जुळून येतोय अद्भूत योग, ‘या’ ३ राशींना मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:27 PM2021-11-12T18:27:10+5:302021-11-12T18:36:13+5:30

Lunar Eclipse 2021: तब्बल ५८० वर्षांनी असे चंद्रग्रहण होत आहे.

सन २०२१ मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते.

यंदाच्या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहणची खंडग्रास प्रकारातील असणार आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी चंद्रग्रहण असून, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कृतिक नक्षत्रात चंद्रग्रहण होईल. या चंद्रग्रहणावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान असेल. (Lunar Eclipse Novemeber 2021)

भारतीय वेळेनुसार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३४ वाजता ग्रहण सुरू होईल आणि ५ वाजून ३३ वाजता संपेल. हे आंशिक चंद्रग्रहण असल्याने भारतात त्याचे वेदादी नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. हे चंद्रग्रहण उत्तर युरोप, अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागराच्या भागात आणि आशियातील बहुतांश भागांमध्ये दिसेल. काहींच्या मते हे ग्रहण भारतातील अरुणाचल प्रदेशमधील काही भागांमध्ये पाहता येऊ शकेल.

गेल्या काही शतकांतील हे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) असल्याचे सांगितले जात आहे. या योग याआधी ५८० वर्षांपूर्वी जुळून आला होता. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने याबाबत माहिती दिली आहे. नासाच्या मते तब्बल ५८० वर्षांनी असे चंद्रग्रहण होत आहे.

सन २०१८ मध्ये एक तास ४३ मिनिटांचे चंद्रग्रहण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०२१ मध्ये होणारे चंद्रग्रहण हे तब्बल ३ तास २८ मिनिटांचे असेल, असे सांगितले जात आहे. या शतकातील हे सर्वांत मोठे चंद्रग्रहण असल्याचे म्हटले जात आहे. (Chandra Grahan November 2021)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहील. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच तुम्ही कुठेतरी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तिथे यश मिळू शकते. व्यावसायिकांनाही या काळात विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे.

दुसरीकडे, मेष, वृषभ, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात काळजी घ्यावी. कारण या लोकांसाठी ग्रहण शुभ नाही, असे सांगितले जात आहे. या ग्रहणाव्यतिरिक्त २०२१ ते २०३० दरम्यान एकूण २० आंशिक ग्रहणे भारतात पाहायला मिळतील.

चंद्रग्रहणापूर्वी किंवा त्यानंतर केलेले दान अधिक लाभदायक असल्याची धर्मशास्त्रांत मान्यता आहे. चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद लाभतात, असे मानले जाते. चंद्रग्रहणात चांदी दान करण्यास प्रचंड महत्त्व आहे.

चांदी दान केल्याने मन मजबूत होते आणि बुद्धी कुशाग्र होते, असे म्हटले जाते. म्हणूनच ग्रहण काळात चांदीची नाणी, मूर्ती आणि भांडी दान केली जातात. चंद्राचा संबंध दूध आणि दह्याशी असल्याने दूध आणि दह्याचे दान केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.

भारतातील बहुतांश भागात हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने याचे वेदादी नियम पाळू नयेत. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे पंचांगकर्त्यांकडून सांगण्यात येते. तसेच कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही, तरी चालतील, असे सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे चंद्रग्रहण केवळ त्याच ठिकाणांवरून दिसून येईल जिथे चंद्र क्षितिजाहून वर असेल. अमेरिकेत सर्व ५० राज्य आणि मेक्सिकोमध्ये राहणारे लोक ही दृश्य आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतील, असे सांगितले जात आहे.