केस गळतीने आहात हैराण?; गुलाबजलाचा असा करा वापर, मग कमाल बघा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:28 AM2019-08-21T11:28:51+5:302019-08-21T11:36:58+5:30

गुलाबजल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? हेच गुलाबजल जेवढं त्वचेसाठी लाभदायक ठरतं, तेवढचं ते केसांसाठीही फायदेशीर ठरतं. फक्त त्वचेवरच नाहीतर, केसांवरही गुलाबजल लावा आणि मग बघा कमाल. जाणून घेऊया केसांना गुलाबजल लावल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

आपल्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये अनेकदा आपल्याकडे केसांना तेल लावण्यासाठीही वेळ नसतो. यामुळे आपले केस कोरडे आणि निस्तेज होऊन केसांवरील चमक नाहीशी होते. अशा परिस्थितीमध्ये गुलाबजल अत्यंत फायदेशीर ठरतं.

आपल्या केसांच्या लेन्थप्रमाणे गुलाबजल एका बाउलमध्ये घ्या. रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांसोबतच संपूर्ण केसांना तेलाप्रमाणे लावा. सकाळी उठल्यानंतर फक्त शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या, केसांचा कोरडेपणा दूर होऊन चमकदार होण्यासही मदत होईल.

जर तुमचे केस शॅम्पू केल्यानंतर काही तासांनंतरही चिपचिपीत दिसत असतील तर त्यासाठी तुम्ही गुलाबजलाचा वापर करू शकता. त्यासाठी 3 चमचे गुलाबजल. एक चमचा मध आणि अर्ध लिंबू एकत्र करून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण शॅम्पू करण्याआधी एक तास केसांना लावा. तुम्हाला फरक जाणवेल.

ऊन आणि उष्णता यांमुळे केस निस्तेज होतात आणि दिवसभराच्या थकव्यामुळे तुम्ही केसांना तेल किंवा हेअर मास्कही लावू शकत नाही. अशावेळी आंघोळीला जाण्याआधी 10 मिनिटं 3 चमचे गुलाबजल घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध एकत्र करून हेअर मास्क तयार करा. हाताच्या बोटांनी केसांना लावा. त्यानंतर 10 मिनिटांनी शॅम्पू करा. हेअर डॅमेजची समस्या दूर होईल.

जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर यावेळी रोज वॉटर मास्क केसांमध्ये लावा. यासाठी दोन टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल आणि दोन टेबलस्पून गुलाबजल व्यवस्थित एकत्र करा. हे संपूर्ण केसांमध्ये व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासापासून दोन तासांपर्यंत लावा आणि त्यानंतर शॅम्पूचा वापर करा. यामुळे गळणाऱ्या केसांची समस्या कमी होईल.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.