केसगळतीबाबत लोकांमध्ये असतात हे समज-गैरसमज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 11:41 AM2018-09-28T11:41:22+5:302018-09-28T11:47:46+5:30

केसगळती किंवा केस वाढवणे याबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज बघायला मिळतात. योग्य ती माहिती न मिळाल्याने त्यांच्या समस्याही सुटत नाही आणि त्यांना फायदाही होत नाही. आठवड्यातून कितीदा केसांना शॅम्पू करावं? किती वेळा करु नये? रोज केस धुतल्याने केस गळतात, असे अनेक समज-गैरसमज असतात. पण यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया...

घाईने केस धुतल्यास केस तुटतात : डोकं अस्वच्छ ठेवल्याने जास्त केस गळतात तर नियमीत शॅम्पू केल्याने कमी गळतात. जे लोक जास्तवेळ एसीमध्ये राहतात त्यांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू करावे. जे बाहेर काम करतात, त्यांना घाम जास्त येतो, त्यामुळे त्यांनी रोज केस धुवावे.

हर्बल शॅम्पूमध्ये डिटर्जेंट नाही : ज्या शॅम्पूमधून जास्त फेस येतो त्यात डिटर्जेंट असतं. हर्बल शॅम्पूही याला अपवाद नाहीये. केवळ शिकेकाई आणि रीठा टाकल्याने गोष्टी बदलत नाहीत. डिटर्जेंटपासून बचाव करायचा असेल तर रीठा, शिकेकाई आणि मेहंदीचं मिश्रण घरीच तयार करा आणि त्याने केस धुवा.

एक्स्ट्रा प्रोटीन असलेले शॅम्पू किंवा लोशन चांगले : अनेक शॅम्पू एक्स्ट्रा प्रोटीन असल्याचा दावा करतात. त्याचप्रकारे प्रोटीनयुक्त सीरम सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. केस धुतांना शॅम्पूमधील प्रोटीन केसांच्या आत जात नाही. याचं काम केसांच्या बाहेरील आवरणाला स्वच्छ करणे हे असतं. केसांना प्रोटीनची गरज असते, पण ते आहातातून मिळू शकतं शॅम्पू किंवा लोशनमुळे नाही.

रोज तेल लावल्याने केस मजबूत होतात : तेल केसांना जड आणि घाणेरडं करतं. आंघोळ केल्यावर तेल लावण्याचा कोणताच फायदा होत नाही. अनेकांना वाटतं की, तेल लावून केस धुतल्याने केस मजबूत होतात. पण हे खरं नाहीये. त्याने केवळ केसांमध्ये लवचिकता आणि चमक येते.

कंडिशनरने केसांचं नुकसान होतं : शॅम्पू केल्यानंतर अनेकजण केसांना कंडिशनर लावत नाहीत. त्यांना वाटतं की याने केस कमजोर होतील. हे चुकीचं आहे. कंडिशनरमुळे केसांची चमक कायम राहते आणि ते मोकळे होतात. पण हे लावताना काळजी घ्या की, ते डोक्याच्या त्वचेला लागता कामा नये, याने केसांचं नुकसान होतं.

तेलाने दूर होतो कोंडा : युवावस्थेत हार्मोन्समध्ये बदल झाल्याने डोक्याची त्वचा तेलकट होते आणि यामुळे केसात कोंडा होऊ लागतो. लोकांना वाटतं की, केसांमध्ये तेल लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. पण असे नाहीये. तेल लावल्याने कोंडा बाहेर कमी येतो. तो त्वचेला चिकटतो.

टक्कल केल्याने किंवा केस कापल्याने केसांची वाढ होते : अनेकजण केसगळती होत असल्याने टक्कल करतात किंवा केस कमी करतात. त्यांना वाटतं की, असे केल्याने केसगळती कमी होईल आणि नवीन केस जास्त प्रमाणात येतील. हा समज चुकीचा आहे. टक्कल केल्याने किंवा केस कापल्याने केसांची वाढ वाढत नाही.