Tata Motors चा मेगा प्लान! १० इलेक्ट्रिक कार लॉंच करणार; जॅग्वार लँड रोव्हरचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 03:00 PM2021-06-30T15:00:51+5:302021-06-30T15:04:47+5:30

Tata Motors: २०२५ पर्यंत १० इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याचा मेगा प्लान टाटाने आखल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून अनेकविध कार निर्माता कंपन्या आता आपल्या कार्सची विविध इलेक्ट्रिक व्हर्जन लॉंच करत आहेत. यात सर्वांत आघाडीचे नाव म्हणजे टाटा.

देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्सने Tata Nexon EV बाजारात सादर करून नवीन यशोशिखर गाठल्याचे पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक कार सेगमेंटमध्ये टाटाची नेक्सॉन इव्ही विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतीय बनावटीच्या Tata Nexon EV च्या आतापर्यंत ४ हजारांहून अधिक यूनिटची विक्री झाली आहे. जानेवारी २०२० मध्ये ही कार लॉंच करण्यात आली होती. गेल्या आर्थिक वर्षांत सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक कार होण्याचा मान या कारला मिळाला आहे.

आताच्या घडीला टाटा मोटर्सकडे भारतात Tata Nexon EV आणि Tata Tigor या दोन इलेक्ट्रिक कार आहेत. मात्र, २०२५ पर्यंत १० इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याचा मेगा प्लान टाटाने आखल्याचे सांगितले जात आहे.

वर्ष २०२५ पर्यंत भारतात १० नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. टाटा मोटर्सचे चेअरमन एन.चंद्रशेखरन यांनी याबाबतची माहिती दिली. यावर्षी आमच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दुप्पट होऊन २ टक्के झाली आहे.

कंपनी देशातील चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर भर देत आहे. तसेच टाटा मोटर्स सेल आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी युरोपमध्ये भागीदार शोधत आहे, असेही चंद्रशेखरन म्हणाले.

कंपनी ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग व्हर्टिकलवर जास्त भर देत असून, कंपनी लवकरच कनेक्टेड आणि ऑटोनॉमस वाहनांच्या सेगमेंटमध्ये जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे.

टाटा समूह भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांनुसार बदल करण्याच्या प्रक्रियेवर वेगाने काम करत असल्याचेही ते म्हणाले. टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोवरच्या सर्व कार २०३६ पर्यंत इलेक्ट्रिक होतील, असे कंपनीने यापूर्वीच म्हटले होते.

तसेच २०२५ पर्यंत जग्वारच्या सर्व कार इलेक्ट्रिक आणि २०३० पर्यंत जग्वार लँड रोवरच्या ६० टक्के कार इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत होतील, असे सांगितले जात आहे.

जागतिक स्तरावर होणारे पर्यावरणीय बदलांनुसार स्थायी व्यापार धोरण राबवले जात आहे. तसेच त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.