कार चालविताना करू नका या तीन चुका; अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 01:02 PM2019-08-20T13:02:30+5:302019-08-20T13:07:23+5:30

केंद्र सरकारने नुकतेच वाहन कायदा सुधारणा विधेयक संमत केले आहे. यामुळे हे नवे नियम 15 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. हे नियम न पाळल्यास 10 पटींनी दंड आकारला जाईल शिवाय तुरुंगवारी, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची तरतूदही आहे.

शाळा किंवा हॉ़स्पिटलच्या परिसरात रस्त्यावर वेगाने वाहन चालविण्यावर बंदी आहे. सर्वसाधारणपणे अशा जागेजवळ स्पीडब्रेकर, फलक लावलेले असतात. मात्र, जरी या ठिकाणी असे काही नसेल तरीही तुमच्या वाहनाचा वेग 25 किमी पेक्षा जास्त जाता नये. अन्यथा तुमचे लायसन जप्त होऊ शकते.

राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग, पूल, वळणे, दृतगती महामार्गांवर वेगवेगळी वेगमर्यादा असते. आता तर अनेक ठिकाणी कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. यामुळे हे कॅमेरा वाहनाचा वेग सेन्सरद्वारे तपासून घरी पावती पाठविली जात आहे. तसेच अगदीच जास्त वेग असल्यास पुढे थांबवून चालकाचे लायसन काही महिन्यांसाठी निलंबित केले जात आहे.

दुचाकी किंवा कार चालविताना मोबाईलवर बोलणे खूप धोकादायक असते. यामुळे वाहन चालवित असताना मोबाईल बोलत असल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो.

कायद्यानुसार चालक गाडी थांबवून नेव्हीगेशनशिवाय अन्य कारणासाठी फोनचा वापर करू शकत नाही. एवढेच नाही ब्ल्यूटूथद्वारे फोनवर बोलणेही बेकायदेशिर आहे.

वाहन चालविताना मोठ्या आवाजात गाणी वाजवत जाणे हे देखिल तुमचे लायसन जप्त करण्याचे कारण ठरू शकते. बऱ्याच ठिकाणी कारच्या काचा खाली करून गर्दी किंवा बाजारातून जात असताना मोठ्या आवाजात गाणी लावली जातात.