"गोळ्या घाला अन् जमीन मोजा!" परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून मोठा तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:49 IST2026-02-20T12:45:26+5:302026-02-20T12:49:23+5:30
परभणीत शेतकरी आक्रमक; मध्यरात्री धरपकड, सहजपूर जवळा गावात ६०० पोलिसांचा फौजफाटा, अख्ख्या गावात संचारबंदी!

"गोळ्या घाला अन् जमीन मोजा!" परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून मोठा तणाव
- मारोती जुंबडे
परभणी: "आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला!" अशा संतप्त घोषणा देत परभणीतील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
गावाची लोकसंख्या अवघी ३६५ असताना ६०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांना शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन ताडकळस व दैठणा पोलीस ठाण्यात हलविण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी नोटिसा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने मध्यरात्री कलम १६८ अन्वये नोटिसा घरांवर चिटकवल्या. तसेच बीएनएस १६३ अंतर्गत गावात निर्बंध लागू करून गटधारकांशिवाय इतरांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून मोठा तणाव; सहजपूर जवळा गावात ६०० पोलिसांचा फौजफाटा #parabhani#marathwadapic.twitter.com/aVllXmPLaZ
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 20, 2026
मोजणीला विरोध दर्शविण्यासाठी वृद्ध महिला, युवक, शेतकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी, रास्ता रोको आणि निषेध यामुळे वातावरण तापले. काही ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केले. दरम्यान, प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि शासकीय कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. तथापि, ग्रामस्थांचा रोष आणि पोलिसांची मोठी उपस्थिती यामुळे परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.