पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:26 IST2026-02-17T11:25:35+5:302026-02-17T11:26:56+5:30
अपघात की घातपात? दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल, वर्षभरानंतर पोलिसांनी तपास सुरू केला

पालक तक्रार करत राहिले, पोलिसांनी मुलाचा मृतदेह 'बेवारस' ठरवून अंत्यसंस्कार उरकले!
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी): गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या २४ वर्षीय अनिकेत बळवंत शेरे या तरुणाच्या नशिबी अत्यंत दुर्दैवी शेवट आल्याचे समोर आले आहे. ज्या मुलाच्या शोधासाठी आई-वडिलांनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले आणि उपोषण केले, त्याच मुलाचा मृतदेह वर्षभरापूर्वीच 'बेवारस' म्हणून पिंगळी रेल्वे स्थानक परिसरात आढळला होता आणि पोलिसांनी त्याची ओळख न पटल्याने अंत्यसंस्कारही उरकले होते. सोमवारी (१६ फेब्रुवारी) जप्त केलेले कपडे पाहून कुटुंबीयांनी आपल्या मुलाची ओळख पटवली आणि एकच हंबरडा फोडला.
नेमकी घटना काय?
९ फेब्रुवारी २०२५ रोजी अनिकेतला त्याचे मित्र श्याम फोपसे आणि संजय जाधव यांनी मद्यप्राशन करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर हे तिघे रेल्वेने परभणीच्या दिशेने गेले. मात्र, श्याम आणि संजय सेलूला परतले, पण अनिकेत घरी आला नाही. अनिकेतचे वडील बळवंत शेरे यांनी वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी तपास केला नाही. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर १ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला.
कपड्यांवरून पटली ओळख
तपासादरम्यान पोलिसांना पिंगळी रेल्वे स्थानक येथे १० फेब्रुवारी २०२५ रोजी एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता, पोलिसांनी जप्त करून ठेवलेले कपडे बळवंत शेरे, आई अंजना आणि बहिणीला दाखवले. ते कपडे अनिकेतचेच असल्याचे ओळखताच संपूर्ण कुटुंबाचा आधार कोसळला. पोलिसांनी आता याप्रकरणी घातपाताच्या संशयावरून आरोपींची कडक चौकशी सुरू केली असून, अनिकेतचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे.