Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:13 IST2026-01-24T16:11:47+5:302026-01-24T16:13:57+5:30
या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Parabhani:सेलूमध्ये वेठबिगारी उघड, तेलंगणाच्या २८ मजूर, १० मुलांची सुटका; चार जणांवर गुन्हा
परभणी : सेलू तालुक्यात तेलंगणा राज्यातून आणलेल्या २८ मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना मागील चार महिन्यांपासून कामाला लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात आर. बी. कन्ट्रक्शनच्या प्राधिकृत अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सामाजिक कार्यकर्ता तथा असंघटित कामगारांचे विशेष सेल, जिल्हा विधिसेवा प्राधिकरण बीडचे सदस्य तत्त्वशील बाबूराव कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार तेलंगणा राज्यातील सामाजिक कार्यकर्ता रामलिंग बिक्षम मंडडी यांनी संपर्क साधून तेलंगणातील काही मजुरांना नांदगाव शेत-शिवार (ता. सेलू) येथे वेठबिगार मजूर म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा विधिसेवा प्राधिकरण परभणीच्या सूचनेनुसार चारठाणा, जिंतूर पोलिस, नायब तहसीलदार व महसूल प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. मजुरांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली असता, जास्त मजुरीचे आमिष दाखवून तेलंगणातून महाराष्ट्रात आणल्याचे, तसेच ठरलेल्या कामापेक्षा अधिक काम करून घेतले जात असल्याचे आणि मजुरीचे पैसे कमी दिले जात असल्याचे मजुरांनी सांगितले. या मजुरांना बाबासाहेब काकडे (आर. बी. कन्ट्रक्शनचे प्राधिकृत अधिकारी), भुसाबागा येरेया, मित्तेकृष्णया व एकतापू पैतया या ठेकेदारांनी कामावर लावल्याचे पुढे आले. प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने सर्व मजुरांना शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षितरीत्या चारठाणा पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे करीत आहेत.
जिल्हा न्यायाधीशांनी साधला संवाद
सेलू तालुक्यातील नांदगाव शेतशिवारात वेठबिगारीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेनंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांनी सुटका करण्यात आलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना कायदेशीर संरक्षणाबाबत दिलासा दिला. कामगारांनी वेठबिगारी दरम्यान भोगलेल्या हालअपेष्टा व मानसिक त्रास याबाबत आपली आपबीती मांडली. जिल्हा न्यायाधीशांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेत कायदा तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असा विश्वास दिला. यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव भूषण काळे उपस्थित होते.