Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:02 IST2026-02-12T09:01:01+5:302026-02-12T09:02:03+5:30
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर गाडी थेट पुलावर आढळून झाला भीषण अपघात

Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी
जिंतूर (परभणी):देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला जिंतूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अकोली पुलावर भीषण अपघात झाला. बुधवारी (१२ फेब्रुवारी) मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंगाखेड येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पुलावर आदळली सुसाट कार
मिळालेली माहिती अशी की, गंगाखेड येथील पाच मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH 14 KF 2790) उज्जैनला देवदर्शनासाठी जात होते. जिंतूर शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या अकोली पुलाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सुसाट वेगातील कार पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा चक्काचूर झाला.
४ मित्रांचा जागीच अंत
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले.
मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. रोहन संजय राठोड (वय २७, रा. गंगाखेड)
२. कृष्णा गुट्टे (वय २८, रा. गंगाखेड)
३. बालाजी आश्रोबा आवटे (वय २१, रा. गंगाखेड)
४. बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय ३०, रा. गंगाखेड)
या अपघातात गोपाळ गणेश रोकडे (वय २५, रा. गंगाखेड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
चालक फरार, पोलिसांकडून तपास सुरू
विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. ऐन तारुण्यात या चार तरुणांचा मृत्यू झाल्याने गंगाखेड शहरात शोककळा पसरली आहे.