पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:22 AM2021-09-15T04:22:47+5:302021-09-15T04:22:47+5:30
परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत ...
परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळतो. त्यामुळे तामिळनाडू सरकारने नीट रद्द करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया येथील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.
बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. या वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात या परीक्षेची तयारी करून वैद्यकीय प्रवेश मिळविणाऱ्या गुणवंतांची कमी नाही. मात्र अशातच तामिळनाडू सरकारने हीच नीट परीक्षा रद्द करून बारावी परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी परभणीत तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी नोंदविले. नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. उलट बारावी परीक्षेत तेवढी पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा पद्धती योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
काय आधारे तामिळनाडू सरकारचा निर्णय
केंद्राच्या नीट परीक्षेतून तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देण्याचे विधेयक तामिळनाडू सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेची गरज नाही, तर बारावीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश देण्याची मुभा या विधेयकाने दिली आहे.
नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यासाठी योग्य आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीच हवी. नीट परीक्षेच्या माध्यमातून ही पारदर्शकता पाळली जाते.
प्रा. संदीप जैस्वाल, तज्ज्ञ
नीट परीक्षेत वस्तुनिष्ठ उत्तरांना महत्त्व असते. तेथे व्यक्तिनिष्ठतेला थारा नाही. शिवाय ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थीच या परीक्षेतून निवडले जातात. त्यामुळे नीट परीक्षा पद्धतीच योग्य आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक वाटतो.