एक हजार चाचण्यांमध्ये आढळले ४३६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:17+5:302021-05-09T04:18:17+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दिलासा निर्माण झाला असला तरी ही आकडेवारी अभास निर्माण ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दिलासा निर्माण झाला असला तरी ही आकडेवारी अभास निर्माण करणारी ठरत आहे. जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्या घटल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. शनिवारी १ हजार ५१ नागरिकांच्या तपासण्या झाल्या. त्यात ४३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या ५४३ अहवालात २७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. या अहवालांचा पॉझिटिव्हिटी रेट ५१ टक्के एवढा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण नोंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे कोरोनाने मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात ३, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ५०८ झाली असून, त्यात ४३ हजार ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार १५७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४४, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २४५, अक्षदा मंगल कार्यालयात ११६, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ८४ रुग्ण उपचार घेत आहेत.
१०३३ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शनिवारी १ हजार ३३ रुग्णांना कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळत नसल्याने रुग्णालयातून सुट्टी दिली. मागच्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.