परभणी : राज्य शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर आता ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची एकही दिवस शाळा झालेली नाही. अशातच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय ६ एप्रिल रोजी एक आदेश काढून घेतला आहे. त्यानंतर ९ व ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर काय नोंद केली जाणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती; परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आता विद्यार्थी, पालकांना प्रत्यक्ष प्रगतिपत्रक हातात कधी पडते, याकडे लक्ष लागले आहे.
ऑनलाईन शिक्षणाचा झाला फायदा
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरात एकदाही शाळा भरली नसली तर या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. तांत्रिक कारणांमुळे या ऑनलाईन शिक्षणात काही भागांत अडचणी आल्या असल्या तरी अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. अनेक शिक्षकांनी तर आपला अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. त्यामुळे या ऑनलाईन शिक्षणाचा फायदाच झाला आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून त्यांच्या प्रगतिपत्रकावर ‘वर्गोन्नत’ असा शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या संदर्भातील सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना लवकरच प्रगतिपत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी
कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरू झाली नाही; पण गडम सर यांनी दिलेले ऑनलाईन शिक्षण व स्वाध्याय यावरच वर्गोन्नती मिळत आहे. खरे तर निकालपत्रात श्रेणीवरून आमची गुणवत्ता कळत होती. मात्र वर्गोन्नतीचा शेरा आल्याने सर्वांना एकाच रांगेत बसावे लागले आहे.
- सोनाली सोनवणे, वालूर
सर्वांसोबत शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती; परंतु यावर्षी शाळा सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे वर्षभर घरात बसून कंटाळा आला आहे. एकही दिवस वर्गात न बसता आणि शिक्षक कोण आहेत, हे माहीत न होताच पुढच्या वर्गात जात आहे, याबाबत समाधान वाटत नाही.
- सार्थक गिणगिणे, वालूर
कोरोनामुळे वर्षभर शाळेत न गेल्याने शिक्षकांकडून प्रत्यक्ष शिकवण्याचे काम झाले नाही; पण कटारे सर हे आठवड्यात एक ते दोन वेळा घरी येऊन स्वाध्याय तपासून मार्गदर्शन करीत होते. यावरच यावर्षी मी पुढच्या वर्गात गेले; पण घरात बसून कंटाळा आला आहे.
- प्रणिता मोरे, देवगांवफाटा