ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. २९ - सचिन तेंडुलकरने जे सिद्ध केलंय, त्यापेक्षा तो जास्त करू शकला असता, परंतु तो टिपिकल मुंबई स्टाईलनं खेळायचा, त्यापेक्षा त्यानं विरेंद्र सेहवागसारखं बिनधास्त क्रिकेट खेळलं असतं तर तो आणखी जास्त करू शकला असता असं मत कपिल देवनं व्यक्त केलं आहे.
येथे एका कार्यक्रमात बोलताना कपिलनं सचिन तेंडुलकरच्या मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात रमण्यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईतल्या क्रिकेटविश्वातल्या मित्रांसोबत रमण्यापेक्षा सचिननं विवियन रिचर्ड्सच्या जास्त गाठीभेटी घ्यायला हव्या होत्या आणि अत्यंत आक्रमक शैलीत, बिनधास्तपणे फलंदाजी करायला हवी होती आणि गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारं निर्दयी क्रिकेट खेळायला हवं असं कपिल म्हणाला.
सचिन शतकावर नजर ठेवून असायचा, परंतु त्यानं द्विशतक, त्रिशतक, एवढंच काय ४०० धावा कशा करायच्या याचा कधी विचारच केला नाही, जे त्याला शक्य होतं. शतक झालं की बास अशी त्याची वृत्ती राहिल्याचं कपिलनं म्हटलंय.
त्यामुळे सचिननं त्याच्यातल्या अंगभूत क्षमतेला न्याय दिला नसल्याची प्रतिक्रिया कपिल देवनं व्यक्त केली आहे.