भुयारी मार्ग अपूर्णच
By Admin | Updated: March 15, 2016 00:38 IST2016-03-15T00:38:13+5:302016-03-15T00:38:13+5:30
सायन-पनवेल मार्गावर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी होणारे भुयारी मार्ग धोबीघाट झाले आहेत. खारघर टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट मिळाल्याने उत्पन्न घटल्याच्या कारणावरून

भुयारी मार्ग अपूर्णच
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सायन-पनवेल मार्गावर पादचाऱ्यांच्या सोयीसाठी होणारे भुयारी मार्ग धोबीघाट झाले आहेत. खारघर टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट मिळाल्याने उत्पन्न घटल्याच्या कारणावरून ठेकेदाराने भुयारी मार्गाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी अर्धवट स्थितीतल्या या भुयारी मार्गामध्ये पाणी साचले असून, त्याचा वापर झोपडपट्टीतील महिलांकडून कपडे धुण्यासाठी होत आहे.
मुंबई-पुणे प्रवासातले अंतर कमी व्हावे व वाहतूककोंडी टळावी यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. सायन -पनवेल रोडवेज कंपनीतर्फे रस्ता रुंदीकरणाचे हे काम झाले असून त्यावर सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर अनेक चौकांमध्ये व महत्त्वाच्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग अथवा पूल उभारले जाणार आहेत. या कामामध्ये बीएआरसी ते कळंबोली दरम्यान १७ पादचारी भुयारी मार्ग व १० पादचारी पुलांचा समावेश आहे. त्यापैकी काही भुयारी मार्गाचे व पादचारी पुलांचे काम सायन पनवेल टोलवेज कंपनीने पूर्ण केलेले आहे. परंतु बहुतांश भुयारी मार्गांचे बांधकाम अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. भुयारी मार्गातली जागा अपुरी असल्याने काम पूर्ण झाल्यानंतरही ते पादचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार आहेत. अशातच ठेकेदार कंपनीनेही खर्च पेलवत नसल्याने भुयारी मार्गाच्या बांधकामात हात वर केले आहेत.
सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणावर झालेला खर्च वसुलीसाठी खारघर येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. परंतु या टोलनाक्याला स्थानिकांचा विरोध झाल्यानंतर सरकारने त्यामधून छोट्या वाहनांना सूट दिली आहे. त्यामुळे अपेक्षित अशी टोलवसुली त्या ठिकाणी होत नसल्याचे ठेकेदार कंपनीने पीडब्ल्यूडीला कळवले आहे. शिवाय नुकसानभरपाईच्या मागणीसाठी इतर टोल कंपन्यांसह सायन-पनवेल रोडवेजनेही न्यायालयातही धाव घेतलेली आहे.
नेरूळ व खारघर येथील भुयारी मार्गात लगतच्या जलवाहिनीचा अडथळा ठरत असल्याने त्या ठिकाणचे काम ठप्प आहे. मात्र उरण फाटा, कळंबोली सर्कल व इतर ठिकाणच्या बांधकामात अडथळा नसतानाही भुयारी मार्ग अर्धवट स्थितीतच आहेत. हे सर्व भुयारी मार्ग गतवर्षी पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरले होते. मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असतानाही भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यात भविष्यातही अडथळा होण्याची शक्यता आहे. खारघर येथील चौकातून मोठ्या प्रमाणात रहदारी होत असल्याने त्या ठिकाणी पादचारी पूल अथवा भुयारी मार्गाची अत्यंत गरज आहे. वाढत्या रहदारीमुळे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात पादचाऱ्यांचे त्या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. यामुळे होणारा भुयारी मार्ग अरुंद असला तरी, उपयुक्त ठरणार होता. परंतु रखडलेल्या कामामुळे खारघरवासीयांच्या पदरी निराशाच पडली आहे.
अपूर्ण स्थितीत बांधलेल्या भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने दिवसा
त्या ठिकाणी कपडे धुतले जात असले तरी, रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
बांधकाम ठप्प असल्याने अनेक भुयारी मार्गांच्या झालेल्या कामाची मोडतोड झालेली आहे. त्यामुळे सर्वच भुयारी मार्गांचे काम पुन्हा नव्याने करणे भाग पडणार आहे. परिणामी, कामाचा खर्च वाढून त्याचा अप्रत्यक्ष फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे.
सायन-पनवेल मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात ठेकेदाराकडून विलंब होत आहे. या प्रकरणी सायन पनवेल रोडवेज कंपनीला नोटीसदेखील बजावलेली आहे. तर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच योग्य पर्याय अवलंबला जाईल.
- सतीश श्रावगे,
कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी