पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पनवेल पॅटर्न
By Admin | Updated: March 11, 2016 02:55 IST2016-03-11T02:55:51+5:302016-03-11T02:55:51+5:30
पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पनवेल पॅटर्न
नामदेव मोरे, नवी मुंबई
पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. परंतु नवी मुंबई महापालिका मात्र मलनि:सारण केंद्रातील १८० एमएलडी पाणी ८ वर्षांपासून रोज गटारामध्ये सोडून देत आहे.
राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पनवेलमध्येही जवळपास दोन महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने पाणी
परिषद घेवून नागरिकांना वास्तव स्थिती समजावून सांगितली. नागरिकांचे मन वळवून एक दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये राजकीय पक्षांनीही समंजसपणाचे दर्शन घडवून कोणतेही राजकारण केले नाही. नगराध्यक्षा चारूशीला घरत, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे व सर्वांनीच पिण्याचे पाणी जपून वापरण्यासाठी जनजागृती सुरू केली. उद्यान, बांधकाम व इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जावू नये, असे आवाहन केले. नगरपालिकेने बंदर रोड परिसरात नदीच्या काठावर १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र बांधले आहे. या केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिकांना ६०० रूपये टँकर व गृहनिर्माण सोसायटीमधील उद्यानांसाठी १०० रूपये टँकर दराने पाणी देण्यास सुरवात केली.
ही योजना सुरू केल्यापासून ९ मार्चपर्यंत १०९ टँकरचे वितरण करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांना पाणी पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांनाही पत्र पाठवून मलनि:सारण केंद्रातील पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर नगरपालिका व महानगरपालिकांसाठी आदर्श ठरला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात अनेक अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरूळ, वाशी व कोपरखैरणे केंद्रांसाठी २०० कोटी रूपये खर्च केला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ७ मलनि:सारण केंद्रे आहेत. यामधून रोज १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे.
शुद्ध केलेले पाणी विकून महापालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न सदर प्रकल्प उभारताना प्रशासनाने दाखविले होते. परंतु २१ जून २००९ ला तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत रोज शुद्ध केलेले पाणी गटारामध्ये सोडून दिले जात आहे. या केंद्रांची देखभाल करण्यासाठी वर्षाला करोडो रूपये खर्च केले जात आहेत.
याशिवाय शहरात मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठीही करोडो रूपये खर्च केला आहे. या वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी २०० कोटी रूपये खर्च झाला आहे. एवढा प्रचंड खर्च करून शहरात पाणीटंचाई सुरू असताना पिण्याच्या पाण्याएवढे शुद्ध असलेले प्रक्रियायुक्त पाणी गटारात जात असल्यामुळे दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २ हजार कोटी रूपयांचा आहे. महापालिकेकडे एकूण सात मलनि:सारण केंद्रे असून त्यांची क्षमता ४४१ एमएलडी क्षमतेची आहे.
दुसरीकडे पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प फक्त १५४ कोटी रूपयांचा असून त्यांच्याकडे फक्त १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र आहे.
परंतु यानंतरही पनवेल नगरपालिकेने या केंद्रातील पाणी बांधकाम व्यावसायिकांना देण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका मलनि:सारण केंद्रातील पाणी खाडीत सोडत आहे. महापालिकेने पनवेल नगरपालिकेचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ६०० व १०० रूपयांत टँकर
पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी ६०० रूपये व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी १०० रूपये दराने एक टँकर पाणी देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये पैसे कमविण्याचा उद्देश नसून पिण्याचे पाणी वाचविण्याची भूमिका आहे. परंतु दुसरीकडे महापालिका मात्र शहरवासीयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना बांधकाम, उद्यान व इतर कामांसाठी पिण्याचे पाणी वापरत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचेही स्वागत
पनवेलमधील नागरिकांकडूनही पाणीबचत करण्यात येत आहे. नील सिद्धी, निलेरा गार्डन व गुरूशरण्य या सोसायट्यांमध्ये उद्यानांसाठी मलनि:सारण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी वापरले जाते. पाणी बचतीच्या मोहिमेला सहकार्य करणाऱ्या सोसायट्यांचे पालिका प्रशासनाने स्वागत केले असून सर्व बांधकामासाठीही प्रक्रिया केलेले पाणी वापर करण्याचे आवाहन केले आहे.