आंध्रातील ‘लक्ष्मी’ नवी मुंबईमध्ये दाखल

By Admin | Updated: November 2, 2015 01:41 IST2015-11-02T01:41:04+5:302015-11-02T01:41:04+5:30

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून फराळ, फटाके, आकाशकंदील, रंग - रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्यांनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत.

'Lakshmi' in Andhra Pradesh filed in Navi Mumbai | आंध्रातील ‘लक्ष्मी’ नवी मुंबईमध्ये दाखल

आंध्रातील ‘लक्ष्मी’ नवी मुंबईमध्ये दाखल

प्रशांत शेडगे, पनवेल
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून फराळ, फटाके, आकाशकंदील, रंग - रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्यांनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून झाडू-झाडणीची पूजा केली जाते.
यंदा आंध्र प्रदेशमधील ३० कारागीर जवळपास ७० हजार झाडण्या घेऊन पनवेल परिसरातील गावागावात विक्री करण्यासाठी दाखल झाले आहेत. दिवाळी म्हटले की आनंद आणि उत्साहाची पर्वणी. फटाके, नवीन कपडे आणि गोडधोड फराळ यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीची चाहूल लागताच घराच्या साफसफाई, रंगरंगोटीला सुरुवात होते.
दीपावलीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे असून, लक्ष्मीपूजनाला झाडणीची पूजा करण्याची परंपरा आहे. घर स्वच्छ ठेवणारी, घरातील लक्ष्मी म्हणून झाडणीची पूजा केली जाते.
महाराष्ट्रातील बारा बलुतेदारी मागे पडल्याने आता पारंपरिक व्यवसाय लोप पावू लागले आहेत. पूर्वी विशेषकरून मातंग समाजाचे लोक झाडणी तयार करीत. आता हा व्यवसाय इतिहासजमा होऊ लागला आहे. त्यामुळे यंदा आंध्र प्रदेशातील ३० जण जवळपास ७० हजार झाडण्या घेऊन पनवेल परिसरात दाखल झाले आहेत.
खजुराच्या पानापासून या झाडण्या तयार करण्यात येतात. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारांत तयार करण्यात येणाऱ्या या झाडण्यांची किंमत १० ते २० रुपये इतकी आहे. एरवी ही मंडळी शेतमजुरी, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मात्र दिवाळीच्या मोसमात महाराष्ट्रात चांगला व्यवसाय असल्याने ते झाडणी बनविण्याचा आपला पारंपरिक व्यवसाय करतात.

Web Title: 'Lakshmi' in Andhra Pradesh filed in Navi Mumbai