हयात नसलेल्या युवतीचा शोध आणि संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:14 AM2020-02-03T00:14:04+5:302020-02-03T00:14:17+5:30

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या.

Detection and questioning of an unidentified young woman | हयात नसलेल्या युवतीचा शोध आणि संशयकल्लोळ

हयात नसलेल्या युवतीचा शोध आणि संशयकल्लोळ

Next

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱ्या रिठाडिया कुटुंबातील मुलगी आरती हिने ३० मार्च रोजी घर सोडले ते कायमचेच. वडील पंचाराम यांच्या तक्रारीवरून नेहरुनगर पोलिसांनी आरती हरवल्याची नोंद दाखल करून घेत तपास सुरू केला. ८ महिने उलटले, तरीही मुलीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने, पंचाराम यांनी टिळकनगर रेल्वे स्थानकात लोकलसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविले. या घटनेने संतप्त झालेला रेगर समाज रस्त्यावर उतरला. पंचाराम यांच्या अंत्ययात्रेला हिंसक वळण लागले. ५ ते ६ हजारांच्या जमावाने जोरदार निदर्शने करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यात ६ पोलीस गंभीर जखमी झाले.

आक्रमक जमावाच्या दबावापोटी पोलिसांनी पंचाराम यांच्या सुसाइड नोटवरून पाच जणांना बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही आणि संशयितांच्या चौकशीत गुरफटलेल्या स्थानिक पोलिसांकडून हा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांनी विशेष पथक नेमून तपासाला सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, अर्चना कुदळे, सहायक उपनिरीक्षक सुरेश पवार, अंमलदार उज्ज्वल सावंत आणि सुनील पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या पथकाने मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या हद्दीपर्यंत तपासाची दिशा निश्चित केली.

या शोधाची सुरुवात आरती राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेज पडताळणीने झाली. त्यातून काहीच हाती न आल्याने आरती आणि तिच्या संपर्कात असलेल्यांचे सीडीआर काढले गेले. त्यात, आरतीने अखेरचा कॉल भागचंद फुलारिया (२३) या तरुणाला केल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून काही हाती न आल्याने, मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांसह ठाणे, नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाणी आणि रेल्वे पोलिसांकडील रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात झाली.

मुलीचा शोध घेणे आव्हान झाले होते. अखेर, तब्बल दहा महिन्यांनी म्हणजेच ३० जानेवारी, २०२० रोजी पोलीस पोलीस पथक सायन रुग्णालयातील अपघाती, तसेच बेवारस मृतदेहांची माहिती घेत असता, एका २२ वर्षीय बेवारस तरुणीचा तपशील त्यांच्या हाती लागला आणि तपासाची दिशाच बदलली.

३० मार्च, २0१९ रोजी त्या तरुणीने टिळकनगर स्थानकात लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. गेले दहा महिने हयातच नसलेल्या व्यक्तीचा तिचे कुटुंबीय, पोलीस शोध घेत होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एकमजली घराच्या पोटमाळ्यावरील खिडकीतून समोरच्या घरात राहणाºया भागचंदशी आरतीची नजरानजर झाली. ओढ वाढत गेली. चॅटिंग वाढत जाऊन एकमेकांचे मोबाइल क्रमांकही शेअर झाले. दोघांची गाठभेट होण्यापूर्वीच आरतीच्या लग्नासाठी घरात बोलणी सुरू झाली.

३० मार्चच्या सायंकाळी आरतीने भागचंदला कॉल करून त्याबाबत सांगितले. भागचंदने तिला घरचे सांगत असल्याप्रमाणे लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघांचे ते संभाषण तिच्या बहिणीच्या कानावर पडले. बहिणीने तिला दटावत याबाबत आईबाबांना सांगण्याची धमकी दिली. तेव्हा ‘जे करायचे ते कर,’ असे म्हणत रागाच्या भरात आरतीने घर सोडले आणि तिने थेट रेल्वेतून उडी घेत आपले आयुष्य संपविले.
ज्या मुलासाठी तिने आयुष्य संपविले, तो एका डोळ्याने अंध आहे. तो विवाहित असून त्याला मूलही आहे. मात्र, आरती त्याबाबत अनभिज्ञ होती. तो आरतीसमोर येण्यास घाबरत होता. आपल्या डोळ्याबाबत समजताच ती फेसबुकवर चॅटिंग सोडून देईल, म्हणून तो नेहमी तिच्याशी लांबूनच बोलत असे.

आरतीला पळवून नेल्याचा संशयावरून भागचंद मात्र अजूनही कारागृहातच आहे. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृतदेह सापडला, त्या दिवशी घटनास्थळावरील तिचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. मात्र, कुणाकडून काही प्रतिसाद न आल्याने आणि मुलीबाबत काहीच माहिती मिळाली नसल्याने बेवारसच्या यादीत तिच्या मृतदेहाचा समावेश झाला. तर शहर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना कुठलेही फोटो मिळाले नसल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कोण खरे, कोण खोटे, हेही तितकेच गूढ आहे.
मुलीच्या शोधासाठी दिवसरात्र एक केला. संपूर्ण युनिटच तिच्या शोधासाठी रवाना झाले. मात्र, दु:ख याचे आहे की, मुलीला वाचवू शकलो नाही. ती जिवंत सापडली असती, तर तपास सार्थकी लागला असता. मुलीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
- दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, कक्ष ६

Web Title: Detection and questioning of an unidentified young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.