“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 16:21 IST2025-09-28T16:18:11+5:302025-09-28T16:21:16+5:30
Deputy CM Eknath Shinde: नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी बोलून केला.

“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde: लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून नेत्यांनी आता कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते नवी मुंबईत बोलत होते.
अतिवृष्टी व पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले असून, काही भागातील पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अशा अवघड परिस्थितीत मी स्वतः अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन आलो. त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, तर त्यांना नक्की मदत करणार. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आजही इथे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक आपत्तीमध्ये धावून जाण्याचे काम शिवसैनिक करत असतो, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युती करायची किंवा नाही ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्याचा विचार करायची गरज नाही. नवी मुंबईत सत्ता आणायची हे आनंद दिघे यांचे स्वप्न होते. त्यांना येथील महापालिकेवर भगवा पहायचा होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करायच्या तयारीला लागा. लोकांचे प्रश्न मांडा, ते सोडवायचे प्रयत्न करा. आपण केलेल्या कामांचा आराखडा त्यांच्यापुढे ठेवा. तुम्ही मेहनत घ्या… बाकी मी पाहून घेतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. येत्या काही दिवसात हे विमानतळ सुरू होईल. नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तो निर्णय लवकरच होईल. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी समिती गठित केली असून, त्यानुसार बदल केले जातील. अटल सेतूमुळे नवी मुंबई मध्ये जलदगतीने पोहोचणे शक्य होत आहे. मेट्रोचे जाळे, नवीन रस्ते अशी सगळी कामे आपण करत आहोत. या सर्वांच्या बळावर नवी मुंबई मनपा सहित सर्व मनपांवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी केला.