उत्तर प्रदेश राज्याच्या विभाजनाची पुन्हा एकदा मागणी जोर धरू लागली आहे. मागील काही महिन्यांपासून पश्चिमी यूपीमधील भाजपा नेत्यांनी राज्याच्या विभाजनाचे समर्थन केले आहे. आता अमेठीतूनही ही मागणी पुढे आली आहे. पूर्वांचल राज्याची स्थापना करण्याची मागणी एका कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री डॉ. संजय सिंह आणि माजी शिक्षण मंत्री डॉ. अमिता सिंह यांनी स्पष्ट शब्दात पूर्वांचलचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा या प्रदेशाला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळेल असं विधान केले.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते डॉ. संजय सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेश देशातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य आहे. जिथे एका प्रशासकीय रचनेतून सुशासन आणणं कठीण होते. जगातील पाचव्या क्रमांकाच्या देशापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात विकास आणि लोकशाही दोन्ही प्रभावित होतात. आता ही वेळ आलीय जेव्हा पूर्वांचलमधील लोकांचा विकास, रोजगार आणि चांगले प्रशासन यासाठी वेगळे राज्य स्थापन झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. प्रस्तावित पूर्वांचल राज्यात उत्तर प्रदेशातील ८ विभागीय मंडळातील २८ जिल्हे समाविष्ट केले जातील. त्यात वाराणसी, चंदौली, जौनपूर, गाजीपूर, आझमगड, प्रयागराज, प्रतापगड, गोरखपूर, अमेठी, कुशीनगर, संत कबीर नगर, अयोध्या, अकबरपूर, सुल्तानपूर, गोंडा यासारख्या प्रमुख भागांचा समावेश आहे. जवळपास ७ कोटी ९८ लाख लोकसंख्या असलेले हे राज्य देशातील १४ वे सर्वात मोठे राज्य होईल. इतकेच नाही पुढील २०२७ च्या निवडणुकीपूर्वी हे अस्तित्वात येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच पूर्वांचल राज्य संयुक्त संकल्प मंचाच्या माध्यमातून राज्याच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी एकत्रित पुढे वाटचाल केली जाईल. पूर्वांचल राज्याच्या मागणीसाठी संघर्ष करणारे सर्व सामाजिक, राजकीय संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन संजय सिंह यांनी केले. पूर्वांचलची भाषा आणि संस्कृती यांची वेगळी ओळख आहे. तरीही इतकी वर्ष हा भाग प्रशासकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिला. नैसर्गिक साधने, सुपीक जमीन, मानवी संशाधन याने समृद्ध असणारा हा भाग सामाजिक आणि आर्थिक मागासलेला राहिला असा आरोप भाजपा नेत्या अमिता सिंह यांनी केला.
दरम्यान, कृषी आणि औद्योगिक विकास न झाल्याने पूर्वांचलमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. नेपाळमधून येणाऱ्या नद्यांवर ठोस रणनीती नसल्याने दरवर्षी इथं पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. या भागाचा विकास करण्यासाठी आरोग्य व्यवस्था, उच्च शिक्षण संस्था, आधुनिक विकास याचा अभाव आहे. जर वेगळे राज्य झाले तर या गोष्टींची कमतरता भासणार नाही. पूर्वांचलमध्ये देशातील सर्वात मोठे विद्युत उत्पादन केंद्र आहे. अयोध्या, काशी, प्रयागराजसारखी धार्मिक केंद्रे आहेत. मुंबई, सूरत, लुधियाना, सिंगापूर, दुबई, मॉरिशस आणि सिलिकॉन व्हॅलीत पूर्वांचलचे लोक मेहनत करत आहेत. आम्हाला पूर्वांचल राज्य द्या, आम्ही भारताला जपान बनवण्याची शक्ती, सामर्थ्य आणि संकल्प ठेवतो असंही भाजपा नेत्या डॉ. अमिता सिंह यांनी म्हटलं आहे.
Web Summary : BJP leaders are advocating for Uttar Pradesh's division, specifically demanding a separate Purvanchal state comprising 28 districts. They cite developmental issues, administrative difficulties, and the region's distinct cultural identity as justification. They believe a new state will foster better governance and economic progress, aiming for its creation before the 2027 elections.
Web Summary : भाजपा नेता उत्तर प्रदेश के विभाजन की वकालत कर रहे हैं, विशेष रूप से 28 जिलों के पूर्वांचल राज्य की मांग कर रहे हैं। वे विकास संबंधी मुद्दों, प्रशासनिक कठिनाइयों और क्षेत्र की विशिष्ट सांस्कृतिक पहचान को औचित्य बताते हैं। उनका मानना है कि एक नया राज्य बेहतर शासन और आर्थिक प्रगति को बढ़ावा देगा, जिसका लक्ष्य 2027 के चुनावों से पहले इसका निर्माण करना है।