विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:38 IST2025-06-13T15:38:05+5:302025-06-13T15:38:49+5:30
अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात २४२ लोक प्रवास करत होते. टाटा समुहाने मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. हे विमान लंडनसाठी निघाले होते. पण, टेक ऑफनंतर आठ मिनिटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेत २६५ लोकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टाटा समुहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी मृतांच्या कुटुंबियांना एक-एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. यानंतर ही मदत फक्त विमानात प्रवास करणाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार की वसतिगृहातील मृतांच्या कुटुंबियांना मिळणार याबाबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता टाटा समुहाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई दिली जाईल. म्हणजे विमानात प्रवास करत असलेल्या २४२ लोकांशिवाय अन्य २४ लोकांच्या कुटुंबियांनाही ही मदत दिली जाणार आहे, असं टाटा समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे.
जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समुह देणार
अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांच्या उपचारांचा खर्च उचलण्यासोबतच त्यांना पूर्ण मदत आणि आवश्यक काळजी मिळेल याची खात्री टाटा ग्रुपने केली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठीही आम्ही मदत करू, असंही टाटा समुहाने सांगितले आहे.
गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमधील सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केले. टेकऑफ केल्यानंतर लगेचच या विमानाला अपघात झाला.
उड्डाणानंतर लगेचच, एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरातील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले . अपघात झाला तेव्हा दुपारच्या जेवणाची वेळ होती आणि मोठ्या संख्येने डॉक्टर आणि विद्यार्थी वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवणासाठी उपस्थित होते. यामुळे वसतिगृहातील अनेकजण जखमी झाले आहेत.