दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:44 IST2025-06-24T10:41:08+5:302025-06-24T10:44:14+5:30
डोवाल SCO सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला गेलेत. ही बैठक बीजिंगमध्ये होणाऱ्या SCO शिखर संमेलनाचा एक भाग आहे

दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
नवी दिल्ली - इराण-इस्त्रायल यांच्यात एकीकडे तणाव वाढलेला पाहता भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी बीजिंगमध्ये भेट घेत चर्चा केली. सोमवारी झालेल्या या बैठकीत सीमावर्ती भागात शांतता, स्थिरता त्याशिवाय दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. डोवाल आणि वांग यांनी भारत-चीन यांच्या संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशाच्या हिताचे आणि विकासाला चालना देण्याच्या मुद्द्यावर चर्चेत भर दिला गेला.
परराष्ट्र मंत्रालयाकडून दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शांतता राखण्यासाठी दहशतवाद्यांचा ठोस सामना करण्याबाबत चर्चा केली. भारताने दहशतवादाचा मुद्दा अशावेळी उचलला आहे जेव्हा मागील काही महिन्यापासून भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून पाकिस्तानला समर्थन मिळत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. भारताच्या या कारवाईनंतर ४ दिवस पाकिस्तानसोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षात १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम करण्यावर सहमती झाली. परंतु भारत-पाकिस्तान संघर्षात चीनकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले होते.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीन यांच्यात LAC वर सुरू असलेला सैन्य संघर्ष रोखण्यावर सहमती बनली होती. त्यानंतर पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या कजान येथे जात चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये भारत-चीन संबंध सुधारण्यापासून सीमेवरील वाद सोडवण्यावरही भर देण्यात आला. यावेळी अजित डोवाल आणि वांग यांच्यातही बैठक झाली होती. डोवाल SCO सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला गेलेत. ही बैठक बीजिंगमध्ये होणाऱ्या SCO शिखर संमेलनाचा एक भाग आहे. वांग आणि डोवाल यांच्यातील बैठकीत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांना पुढील चर्चेसाठी भारतात आमंत्रित केले आहे.
NSA Ajit Doval met Chinese FM Wang Yi in Beijing. Discussions focussed on bilateral, regional & international issues of mutual interest.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) June 24, 2025
Press Release at : https://t.co/YnnzxDNk4mpic.twitter.com/Pgekzt4N50
डोवाल यांच्या चीन दौऱ्याचे महत्त्व काय?
अजित डोवाल यांनी चीनमध्ये परराष्ट्र मंत्र्यांची अशावेळी भेट घेतली जेव्हा कैलाश मानसरोवर यात्रेसाठी भारतीय भक्त रवाना झाले आहेत. ५ वर्षाच्या अंतराने पुन्हा एकदा ही यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध सर्वसामान्य करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. याआधीही भारत-चीन यांचे संबंध सुधारण्यासाठी अनेक बैठका झाल्या. दोन्ही देशातील नेते चर्चेतून वादग्रस्त मुद्दे एकत्रित सोडवण्यावर भर देतात. सीमेवर शांतता राखणे, दहशतवादाचा सामना करणे यासारख्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.