नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:05 IST2025-05-27T13:00:14+5:302025-05-27T13:05:49+5:30
नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली.

नागपूरची महिला मुलाला गावात सोडून पाकिस्तानात का गेलेली? समोर आलेलं कारण ऐकून हैराण व्हाल!
एकीकडे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, आता भारतातून काही हेर पकडले जात आहे. भारतात राहून देशाची गुप्त माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानचे हेर देशभरातून पकडले जात असतानाच, नागपूरमधील एक महिला सीमा पार करून पाकिस्तानात पोहोचल्याचे समोर आले होते. भारतीय सैन्याकडून या महिलेचा शोध घेतला जात होता. अखेर आता ही महिला सापडली असून, ती पाकिस्तानात का गेली होती याचे करण देखील समोर आले आहे.
नागपूरची सुनीता जमगडे नावाची महिला आपल्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन लडाख फिरण्यासाठी गेली होती. मात्र, तिने आपल्या मुलाला सीमेलगतच्या गावात सोडले आणि ती पसार झाली. यानंतर सैन्याने आणि पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, गावात तिने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. तिचे फोन कॉल डिटेल तपासताच त्यात काही पाकिस्तानी क्रमांक आढळून आले होते. यावरून सुनीता पाकिस्तानात गेली, यावर शिक्कामोर्तब झाला होता. ज्योतीप्रमाणे सुनीता देखील या हेरगिरी प्रकरणात सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता खरे कारण समोर आले आहे. सुनीता पाकिस्तानात राहणाऱ्या एका पाद्रीच्या प्रेमात पडली होती,आणि त्याच्यासाठी ती पाकिस्तानात गेल्याचे समोर आले आहे.
या आधीही केलेला प्रयत्न!
पाकिस्तानी रेंजर्सनी सोमवारी अटारी सीमेवर या महिलेला भारतीय सुरक्षा दलाच्या हवाली केले. यावेळी चौकशी दरम्यान, सुनीताने सत्य सांगत आपण प्रेमासाठी पाकिस्तानात गेल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता एक पाकिस्तानी पाद्रीच्या प्रेमात पडली होती. त्याला भेटण्यासाठी सुनीताने हे पाऊल उचलल्याची कबुली दिली. या आधीही तिने सीमा ओलंडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी तिला सैनिकांनी अडवले होते. यावेळेस मात्र तिचा प्रयत्न सफल झाला होता.
अधिक तपास सुरू
सुनीताने भारताची सीमा पार केली होती. मात्र,पाकिस्तानात पोहोचण्यापूर्वीच रेंजर्सनी तिला ताब्यात घेतले. यानंतर पाकिस्तानने तिला भारताकडे सुपूर्द केले. सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा तिची चौकशी करत आहेत. सुनीताचे फोन, मेसेज तपासले जात आहेत.