व्हाईटपेपर V/s ब्लॅकपेपर... सत्ताकाळातील कारभारावरुन युपीए अन् एनडीए आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 08:03 AM2024-02-09T08:03:50+5:302024-02-09T09:52:17+5:30

शनिवारी राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

White Paper V/s Black Paper... UPA and NDA Face to Face on Incumbency | व्हाईटपेपर V/s ब्लॅकपेपर... सत्ताकाळातील कारभारावरुन युपीए अन् एनडीए आमने-सामने

व्हाईटपेपर V/s ब्लॅकपेपर... सत्ताकाळातील कारभारावरुन युपीए अन् एनडीए आमने-सामने

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेची चिरफाड करणारी ‘श्वेतपत्रिका’ आज केंद्र सरकारने लोकसभेत सादर केली. यूपीए सरकारच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटांवर एनडीए सरकारने यशस्वीरीत्या मात केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. त्यावर उद्या, शुक्रवारी दुपारी लोकसभेत, तर शनिवारी राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

यूपीए सरकारला वारशात धडधाकट आणि मोठ्या सुधारणांसाठी सज्ज झालेली अर्थव्यवस्था लाभूनही २००४ ते २०१४ या दहा वर्षांत अर्थव्यवस्था अनुत्पादक बनल्यामुळे देशाचा आर्थिक पाया कमकुवत झाला, असा आरोप त्यात करण्यात आला.  त्यानंतर एनडीए सरकारने विविध आव्हानांचा सामना करीत त्यावर कसा विजय मिळविला, याचाही विस्तृत तपशील तीन भागांतील ६९ पानांच्या या ‘श्वेतपत्रिके’त दिला आहे. 

भांडवली खर्चात पाचपट वाढ
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारला कठोर निर्णय घेणे भाग पडले. आमच्या सरकारने दहा वर्षांत अर्थव्यवस्थेला धक्का न लागू देता अर्थसंकल्पातील भांडवली खर्चात पाच पटींनी वाढ केली, असा दावा सीतारामन यांनी केला.

१० वर्षांच्या कारभारावर बाण
nयूपीए सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया खिळखिळा केला. यूपीएच्या काळात रुपया मोठ्या प्रमाणावर गडगडला. 
n२०१४ साली बँकिंग क्षेत्र संकटात सापडले. परकीय चलन लक्षणीय घटले हाेते.  
nअर्थसंकल्पाच्या तुलनेत २७ टक्के जास्त कर्ज घेण्यात आले. महसुलाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला. 
nमहागाईने सामान्यांना होरपळून काढले. वित्तीय तुटीचे संकट वाढले, कर्जाचा वापर अनुत्पादक कारणांसाठी केला. 
nधोरणांच्या सुमार नियोजनामुळे सामाजिक क्षेत्राच्या असंख्य योजनांवर निधीचा वापर होऊ शकला नाही.

दहा वर्षांचा काळ हा अन्यायाचा काळ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यूपीए कार्यकाळातील अर्थव्यवस्थेवर जारी केलेल्या ‘श्वेतपत्रिके’ला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आज लगेचच ‘ब्लॅकपेपर’ काढला. ‘दस साल, अन्याय काल’ असे या ब्लॅकपेपरला नाव देण्यात आले. त्यात एनडीए सरकारच्या दहा वर्षांतील अपयशाचा पाढा वाचण्यात आला.
महागाई, बेरोजगारी, सामाजिक न्याय, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि इतर अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला आलेले अपयश या ब्लॅकपेपरमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. मोदी सरकार आपले अपयश लपवत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. देशातील बेरोजगारांचा आकडा ४ कोटींवर पोहोचला आहे. प्रत्येक तासाला दोन आत्महत्यांची नोंद केली जात आहे. पदवीधरांमध्ये ३३ टक्के बेरोजगार आहेत. ईडी, सीबीआय, आयकरच्या माध्यमातून धमकावून दहा वर्षांत ४११ आमदारांना भाजपने आपल्या पक्षात आणले, असा आरोप करण्यात आला.

किती दिवस नेहरू-गांधींची तुलना?
दहा वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, तरी तुम्ही अद्यापही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाशी तुलना करता. मग तुम्ही तुमच्या कार्यकाळात काय केले, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

बेरोजगारी, महागाईने छळले
nकेंद्र सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. बेरोजगारी वाढल्याने युवावर्गात प्रचंड रोष आहे.
nमहागाईवर सरकार गप्प आहे. पेट्रोल-डिझेलसह दैनंदिन गरजेच्या वस्तू वधारल्या. महागाई रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत. 
n२०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. 
nजातजनगणना करण्यात सरकार अपयशी ठरले, तर महिलांवरील अत्याचार वाढले आहे.
nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही.

 

Web Title: White Paper V/s Black Paper... UPA and NDA Face to Face on Incumbency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.