केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:16 IST2025-06-21T17:13:30+5:302025-06-21T17:16:26+5:30
Amit Shah Reaction On Indus Water Treaty : "आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले..."

केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
भारताने सिंधू पाणी करार कायमचा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार आता पु्न्हा पूर्ववत होणे नाही. पाकिस्तानने या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यामुळे आता त्याला पूर्वी जे पाणी मिळत होते, ते मिळणार नाही. असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिंद्धू पाणी करारासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शाह म्हणाले, "हा करार आता कधीही पूर्ववत होणार नाही. आंतरराष्ट्रीय करार एकतर्फी रद्द करणे सोपे नसते. मात्र, आम्हाला तो स्थगित करण्याचा अधिकार होता आणि आम्ही तेच केले. हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्या शांतीच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने करण्यात आला होता. मात्र, याच्या अटीच मोडल्या गेल्या, यामुळे याचे औचित्य संपले.
पहलगाम दहशतवादी हल्लायनंतर घेण्यात आली अॅक्शन -
गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे भारतात प्रचंड संतापाची आणि दुःखाची लाट होती. चानंतर लगेचच भारताने सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्यासारखे अनेक राजकीय निर्णयही घेतले होते.
पहलगाम हल्ल्याचा निषेध करत काय म्हणाले अमित शाह? -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले, काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे आणि तरुणांची दिशाभूल करण्याचे हे षड्यंत्र होते. पहलगाम हल्ला काश्मीरमधील वाढते पर्यटन थांबवण्यासाठी आणि तरुणांना विकासाच्या मार्गावरून भरकटवण्यासाठी जाणूनबुजून करण्यात आला होता. मात्र, खोऱ्यातील लोक आता पूर्वीच्या तुलनेत भारतासोबत उभे आहेत," असेही शाह म्हणाले.