नवी दिल्ली : एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१च्या दुर्घटनेबाबत विमान दुर्घटना अन्वेषण ब्यूरोने (एएआयबी) आपला प्राथमिक अहवाल मंगळवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला. मात्र हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, त्याबद्दल या अहवालात काय म्हटले आहे, याबद्दलचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे एआय-१७१ हे बोईंग ड्रीमलाइनर विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृहात असलेल्यांपैकी काहीजणदेखील मृत्युमुखी पडले. सदर अपघातातील मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीत नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एएआयबीला सर्व सहकार्य केले.
गोल्डन चॅसिसकडून माहितीच्या अचूकतेची तपासणीअहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मोड्युलमधील माहिती डाउनलोड करण्यात यश आले आहे. त्या माहितीची अचूकता तपासण्यासाठी त्याच प्रकारचा दुसरा ब्लॅक बॉक्स, ज्याला ‘गोल्डन चॅसिस’ म्हटले जाते, त्याचा वापर करण्यात आला. या तपास पथकात भारतीय हवाई दल, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अमेरिकेतील नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांचे तज्ज्ञ सहभागी आहेत. याशिवाय, बोईंग, जीई, हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनीही या तपासात सहकार्य केले.