कुत्र्यावरून मोडलेल्या लग्नात आता नवा ट्विस्ट; 'फिल्मी स्टाईल'ने नवरी सासरी आली अन् म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:53 IST2026-02-23T14:52:25+5:302026-02-23T14:53:03+5:30
पाळीव कुत्र्याला मारहाण केल्याच्या वादातून मोडलेल्या लग्नात आता चार दिवसांनी नवा ट्विस्ट आला आहे.

कुत्र्यावरून मोडलेल्या लग्नात आता नवा ट्विस्ट; 'फिल्मी स्टाईल'ने नवरी सासरी आली अन् म्हणाली...
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा कोतवाली परिसरात १८ फेब्रुवारीच्या रात्री पाळीव कुत्र्याला मारहाण केल्याच्या वादातून मोडलेल्या लग्नात आता चार दिवसांनी नवा ट्विस्ट आला आहे. रविवारी नवरी तनू केसरवानी प्रयागराज येथील आपल्या घरातून पळून थेट खागा येथील नवरदेवाच्या घरी पोहोचली. लग्नादरम्यान मंडपात पाळीव कुत्रा भुंकल्याने वऱ्हाडी मंडळींनी त्याला मारहाण केली होती. यावरून दोन्ही पक्षांत जोरदार हाणामारी झाली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
वादामुळे चिडलेल्या नवरीने लग्नास नकार दिला होता. मात्र आता नवरीने आपल्याच कुटुंबीयांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत नवरदेवासोबतच जगण्या-मरण्याची शपथ घेतली आहे.लग्नामध्ये नवरदेवाकडील एका तरुणाने कुत्र्याला मारहाण केली, ज्यामुळे वाद इतका वाढला की खुर्च्या आणि लाठ्या-काठ्या चालल्या. यात वधू पक्षाचे तीन जण जखमी झाले आणि प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यावेळी नवरीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांचे दागिने-वस्तू परत केले होते.
लग्नाला चार दिवस उलटल्यानंतर अचानक नवरी तनू नवरदेवाच्या घरी पोहोचली, तिला पाहून सर्वच जण थक्क झाले. तनूने सांगितलं की, "त्या रात्री वादानंतर घरचे लोक मला घाबरवत होते की, जे आता हाणामारी करत आहेत ते नंतर तुलाही मारतील. मी कुटुंबीयांच्या दबावाखाली आणि सांगण्यावरून माझं लग्न मोडलं होतं. पण घरी गेल्यानंतर मला जाणीव झाली की मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही, त्यानंतर मी गुपचूप घर सोडून आले आहे."
नवरदेवाकडे परतलेली नवरी आता कोणत्याही परिस्थितीत माहेरी जाण्यास तयार नाही. तिचं म्हणणं आहे की, तिने हा मोठा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला असून आता ती तिच्या पतीसोबतच राहणार आहे. वादानंतर जखमींवर उपचार करण्यात आले होते आणि दोन्ही बाजूंच्या संमतीने भेटवस्तू परत करण्यात आल्या होत्या. मात्र, नवरीच्या या धाडसी निर्णयामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.