Aparna Yadav Joins BJP : मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:04 IST2022-01-19T14:04:10+5:302022-01-19T14:04:33+5:30
अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे.

Aparna Yadav Joins BJP : मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य
अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. अपर्णा या समाजवादी संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या सूनबाई आहेत. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करणे, हे समाजवादी पक्षासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे कौतुक केले. तसेच, त्यांच्यासाठी राष्ट्रधर्म सर्वोपरी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
अखिलेश यादव अपेक्षांवर खरे उतरू शकले नाही, म्हणून भाजपत जाण्याचा निर्णय घेतला? यावर अपर्णा यादव म्हणाल्या, असे नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून खूप प्रभावित आहे. त्यांची धोरणे मला नैतिकदृष्ट्या सुखावणारी आहेत, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आज तक या वृत्त वाहिनीशी बोलत होत्या.
अपर्णा यांना पुढे विचारण्यात आले की, अखिलेश यादव आणि सपा राष्ट्रधर्म पाळत नाहीत का? यावर अपर्णा म्हणाल्या की, कुटुंबापासून वेगळ्या लाईनवर जावून मला कुठलेही भाष्य करण्याची इच्छा नाही. तसेच, गल्या पाच वर्षांत मुंख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या प्रकारे काम केले आहे, जेवढ्या योजना आणल्या आहेत, त्या अत्यंत प्रभावी आहे, असे माझे वैयक्तीक मत आहे. यावेळी भाजप यूपीमध्ये किती जागा जिंकू शकते आणि त्या लखनऊ कॅंटमधूनही निवडणूक लढवणार का? यावर अपर्णा म्हणाल्या, आपण कुठल्याही अटी शिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशात भाजपच सरकार स्थापन करेल.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अपर्णा म्हणाल्या, 'सर्वांनाच माहित आहे की, मी पंतप्रधान मोदींपासून प्रभाव आहे आणि माझ्या विचारात राष्ट्र प्रथम आहे. माझ्यासाठी राष्ट्रा धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. मी आता राष्ट्रपूजा करण्यासाठी बाहेर पडले आहे, यात मला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. यावेळी अपर्णा यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियान, महिला आणि रोजगारासाठी चालविल्या गेलेल्या योजनांचाही उल्लेख केला आणि कौतुक केले.