'संभलमध्ये 209 हिंदूंची हत्या', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:59 IST2024-12-16T15:59:15+5:302024-12-16T15:59:35+5:30
UP Assembly Winter Session: उत्तर प्रदेश विधानसभेत योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली.

'संभलमध्ये 209 हिंदूंची हत्या', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे वक्तव्य
UP Assembly Winter Session: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभल आणि बहराइचमधील हिंसाचारावर मोठे विधान केले आहे. संभलमधील सर्वेक्षणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले जात होते, विरोधत लोकांची दिशाभूल करत आहेत. कोणी जय श्री राम म्हणत असेल, तर विरोधकांना राग येण्याचे काय कारण? 2017 पासून आतापर्यंत जातीय हिंसाचाराच्या घटना 97 ते 99% पर्यंत कमी झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आतापर्यंत 209 हिंदूंची हत्या
सीएम योगी पुढे म्हणतात, संभलमध्ये वातावरण कसे बिघडले? त्याचा इतिहास 1947 पासून सुरू झाला. 1947 मध्ये 1 मृत्यू झाला, 1948 मध्ये 6 मृत्यू झाले, 1958, 1962 मध्ये दंगल झाली, 1976 मध्ये 5 मृत्यू झाले, 1978 मध्ये 184 हिंदूंची हत्या झाली, हे सत्य विरोधक मान्य करणार नाही. 1980 मध्ये दंगल झाली, 1982 मध्ये दंगल झाली, 1986 मध्येही 4 लोक मारले गेले, 1990 मध्ये 92, 1996 मध्ये 2, हा ट्रेंड कायम राहिला. 1947 पासून आतापर्यंत 209 हिंदू मरण पावले, त्यांच्याबद्दल कोणी एक शब्दही शोक व्यक्त करत नाही.
सपा-काँग्रेसच्या काळात सर्वाधिक दंगली
विरोधकांनी हा मुद्दा केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आणि अजेंड्यासाठी उपस्थित केला. NCRB च्या आकडेवारीनुसार, राज्यात 2012 ते 2017 पर्यंत 817 दंगली झाल्या, ज्यात 192 लोक मरण पावले. तर, 2007 ते 2011 दरम्यान 616 जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या, ज्यामध्ये 121 लोकांचा मृत्यू झाला. पण, आमचे सरकार आल्यावर अशा घटनांना आळा बसला आहे. 2017 पासून आतापर्यंत जातीय हिंसाचाराच्या घटना 97 ते 99% पर्यंत कमी झाल्या आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
एकाही गुन्हेगार सोडणार नाही
संभलमध्ये 48 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिराबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या लोकांनी तिथे मंदिर उघडू दिले नाही, 22 विहिरी बंद केल्या. तिथले वातावरण इतके तणावग्रस्त कोणी केले? संभलमध्ये ज्याने दगडफेक केली, त्या एकालाही सोडले जाणार नाही. या दंगलींमुळे राज्यातील वातावरण सतत बिघडत चालले आहे. आज राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. बहराइचमध्ये शोभा यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल योगी म्हणाले की, निर्दोष राम गोपाल मिश्रा यांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हिंदू वस्तीतून मुस्लिम मिरवणूक निघू शकते, तर मुस्लिम वस्तीतून हिंदू मिरवणूक का काढू शकत नाही? विरोधकांचे राजकारण नेहमीच फूट पाडण्याचे राहिले आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.